मुंबई : गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विविध स्थानकांवरून रत्नागिरी, सावंतवाडी आणि ठोकूरसाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष ४२ गाड्या विशेष भाड्याने धावणार आहेत. त्यांचे आरक्षण ९ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
मुंबई सेंट्रल–ठोकूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०९०१३ मुंबई सेंट्रलहून १५ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूरला पोहोचेल. परतीची ०९०१४ गाडी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठोकूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रलहून बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ११ ते २३ सप्टेंबरदरम्यान ही सेवा चालविण्यात येणार आहे. परतीची ०९०२० गाडी गुरुवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी पहाटे ४.५० वाजता सावंतवाडी रोडहून सुटून त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. या सेवेच्या १६ फेऱ्या होणार आहेत.
बांद्रा टर्मिनस–रत्नागिरी अनारक्षित विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०९०३५ १७ आणि २४ सप्टेंबर रोजी दुपारी २.२० वाजता बांद्रा टर्मिनसहून सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची ०९०३६ गाडी १८ आणि २५ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता रत्नागिरीहून सुटून दुपारी १२.३० वाजता बांद्रा टर्मिनसला पोहोचेल. या गाडीत केवळ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
९ ऑगस्टपासून आरक्षण
गाडी क्रमांक ०९०१३, ०९०१९, ०९०३०, ०९०२२, ०९११४, ०९११० आणि ०९१२४ यांचे आरक्षण ९ ऑगस्ट पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. गाड्यांच्या थांब्यांच्या वेळा आणि डब्यांच्या रचनेची सविस्तर माहिती रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.