महाराष्ट्र

बारामतीच्या रिंगणात युगेंद्र पवार उतरणार; उमेदवारीचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार

बारामतीची जनता व अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले तर आपण मागे हटणार नाही, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जे घडले ते बारामतीच्या स्वाभिमानी जनतेला बिल्कूल आवडलेले नाही. असे सांगतानाच निवडणूक लढविण्यापासून आपण अलिप्त राहणार नाही. बारामतीची जनता व अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले तर आपण मागे हटणार नाही, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबातील दोन नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार, यांच्यातच लढत होण्याची शक्यता जोर धरत आहे.

राष्ट्रवादी पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी लोकसंपर्क वाढवण्यासाठी स्वाभिमान यात्रा काढली होती. अमेरिकतून उच्च शिक्षण घेऊन आलेले युगेंद्र शरद पवार यांच्या फार जवळचे आहेत. पवारांच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवार राजकारणाचे धडे घेत आहेत. स्वाभिमान यात्रा हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल.

बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे यावेळच्या निवडणुकीत बारामतीत बदल घडवून आणणार का, असा प्रश्न विचारला असता आपण कोणालाही बदलण्यासाठी इच्छुक नाही आहोत. पण पवार साहेबांसोबत जे काही घडले ते बारामतीच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेले नाही. त्यामुळे यावेळी कोण निवडणूक लढवणार याचा निर्णय स्वत: पवार साहेब आणि बारामतीची जनता घेईल, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.

अजित पवार यावेळी बारामतीतून न लढता दुसऱ्या मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू होती. परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे बारामती मतदारसंघात दोन पवारांमध्येच लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय