मुंबई : यंदाच्या रामलीला कार्यक्रमासाठी मैदानासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत द्या, अग्निशमन शुल्क माफ करा, अशा प्रकारचे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रामलीला उत्सवात भाजप मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरवर्षी नवरात्रौत्सवात मुंबईत विविध ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते; मात्र यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच या कार्यक्रमा विषयी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांची पालिका प्रशासना बरोबर बैठक होते आणि मंडळांच्या अडचणी, परवानग्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे आता रामलीला मंडळांच्या समस्या पालिका सोडवणार आहे. मुंबईतील आझाद मैदानासह विविध ठिकाणी रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या रामलीला कार्यक्रमासाठी मैदानासाठी ५० टक्के सवलत द्या अग्निशमन शुल्क माफ करा, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे लोढा यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात पालिका मुख्यालयात नुकतीच मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीत रामलीलाचे आयोजक, पोलीस व पालिका अधिकारी उपस्थित होते.
रामलीलाचे आयोजक आपली संस्कृती आणि वारसा पुढे नेत आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते सहकार्य करणे गरजेचे आहे. विशेषत: आझाद मैदानावर रामलीला आयोजित करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना पालिकेने सहकार्य करावे आणि मैदानाचे शुल्क ५० टक्के कमी करावे.
- मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर