मुंबई

वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या ‘एल क्लासिको’मध्ये कोणता संघ सरशी साधणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष

प्रतिनिधी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) महासत्ता. जेव्हा सर्वोत्तम संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी मिळणे ठरलेलेच. स्पर्धेची अथवा दोन्ही संघांची गुणतालिकेतील स्थिती कशीही असली, तरी या दोघांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी देशभरातील चाहते आतुर असतात. त्यामुळे गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर उभय संघांत रंगणाऱ्या ‘एल क्लासिको’मध्ये कोणता संघ सरशी साधणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

फुटबॉलमध्ये ज्यावेळी रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना हे दोन तोडीसतोड संघ आमनेसामने येतात, त्या लढतीला एल क्लासिको असे ओळखले जाते. त्याचप्रमाणे जवळपास गेल्या १० वर्षांपासून क्रिकेटमध्ये मुंबई-चेन्नई यांच्यातील सामन्यालाही तोच दर्जा चाहत्यांनी मिळवून दिला.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचे यंदाच्या हंगामातील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. मुंबईला चेन्नईविरुद्ध झालेल्या गेल्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईचा संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघही गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी असून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना मुंबईला नमवणे अनिवार्य आहे. त्यामुळे वानखेडेवर गुरुवारी रसिकांना रोमहर्षक लढत पाहायला मिळणार, हे निश्चित.

बुमरापासून सावध

जसप्रीत बुमराने कोलकाताविरुद्ध काही दिवसांपूर्वीच झालेल्या सामन्यात पाच बळी पटकावले. त्याशिवाय चेन्नईविरुद्ध बुमराची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे चेन्नईला बुमरापासून सावध राहावे लागेल. फलंदाजीत सूर्यकमार यादवची अनुपस्थिती मुंबईला प्रकर्षाने जाणवेल. त्यामुळे रोहित, इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकाला डावाला आकार देण्याचे कार्य करावे लागेल.

जडेजाबाबत संभ्रम

अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडू शकते. फलंदाजीत डेवॉन कॉन्वे आणि अंबाती रायुडू चेन्नईसाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्याशिवाय धोनीही उत्तम लयीत आहे. मुकेश चौधरी आणि महीष थिक्षणा चेन्नईच्या गोलंदाजी विभागाची धुरा वाहतील. ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा यांना कामगिरी उंचवण्याची गरज आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास

वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन