आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार 
मुंबई

Mumbai : आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक पुढील वर्षी ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक पुढील वर्षी ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'चैत्यभूमी' येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'स्मारकाचे बांधकाम सुरू आहे आणि पुढील वर्षी ६ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.'

ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले. समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्मारकाच्या कामात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारने मे २०२२ मध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप-समिती स्थापन केली होती.

भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ४.८४ हेक्टर जागेवरील या स्मारकाच्या विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले होते. हे संपूर्ण ठिकाण 'शांतिस्थळ' म्हणून परिकल्पित आहे. यात महान समाजसुधारक आणि कायदेतज्ज्ञ डॉ. आंबेडकरांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व दर्शविणारी उद्याने असतील. या स्मारकाचे मुख्य आकर्षण म्हणजे एक भव्य, कांस्याने मढवलेली मूर्ती असणार आहे. स्मारक संकुलात १,००० आसनांचे सभागृह, व्याख्यान कक्ष, ग्रंथालय, परिषद कक्ष, ध्यान केंद्र, परिक्रमा पथ, प्रशासकीय कार्यालय, वाहनतळ आणि इतर सुविधांचा समावेश असेल.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल