मुंबई

रस्त्यावरचे शीतपेय पिताना सावधान! अपायकारक असल्याचे आढळल्यास दुकानदारांवर होणार कारवाई

गिरीश चित्रे

उन्हाचा मारा त्यात घामाच्या धारा यातून शरीराला गारवा मिळावा यासाठी आंब्याचा रस, उसाचा रस, कलिंगड ज्यूस अशी विविध शीतपेय घेतो; मात्र ही पेय शरीरास हानिकारक ठरू शकतात. अशा प्रकारची शीतपेयं विक्री करणारा स्वच्छ पाण्याचा वापर करतो का, खराब फळांचा वापर करतो का, याचा आपण विचार करत नाही. परंतु मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत शरीरास हानिकारक अशी शीतपेयं विक्री करणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणार आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. ३४ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान मुंबईचे तापमान असते. रस्त्यावर मिळणारे सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे खाऊन उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर दिलासा मिळवत आहेत, पण मुंबईकरांच्या आरोग्यास रस्त्यावर विकले जाणारे सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे हानिकारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शरीरास अपायकारक शीतपेय असल्याचे नमुन्यात स्पष्ट झाल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येतो, शरीरास हानिकारक, तर संबंधित दुकानदाराविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागांचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

उन्हाळ्यात शीतपेयाच्या मागणीत वाढ होते. प्रत्येकजण गरमीपासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयाचा आधार घेत शरीरातील तापमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो; मात्र हाच प्रयत्न आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.‌ त्यामुळे शरीरास हानिकारक अशा प्रकारे ज्यूस विकणाऱ्यांवर दरवर्षी एप्रिल मे महिन्यात कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. यंदाही अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विक्री करणाऱ्या शीतपेय विक्रेत्यांकडून विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. यात फळ, साखर, बर्फ आदी पदार्थांचे नमुने घेण्यात येतात. तसेच दुकानात अस्वच्छता आहे, याचीही तपासणी केली जाते. दरम्यान, तपासणीसाठी घेण्यात आलेले नुमने शरीरास हानिकारक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले, तर रितसर कारवाई करण्यात येते, असे केकरे यांनी सांगितले.

‘शीतपेय’ टाळा!

"मुंबईचा पारा वाढत असून, पुढील काही दिवसांत तापमान ४० डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, अतिसार या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. तसे दुपारी १२ ते ४ च्या वेळेत उन्हात जाणे जमल्यास टाळावे. स्वतः काळजी घेत पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ बाळगावी, सतत पाणी पीत राहणे, उन्हात जाताना छत्री घेऊन जाणे. विशेष म्हणजे, वाढत्या तापमानात कलिंगड ज्यूस, सफरचंद ज्यूस कुठल्याही प्रकारचे शीतपेय पिणे टाळावे, कारण ज्यूस कशा प्रकारे बनवला याची माहिती आपणास नसते. त्यामुळे शीतपेय, जंक फूड खाणे टाळावे."

- डॉ. मंगला गोमारे, आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

‘अशी’ होते कारवाई

- परवाना नसेल, तर परवाना घेण्याची सूचना केली जाते

- १ रुपया ते दोन लाखांपर्यंत दंड

- १५ दिवस ते महिनाभरासाठी परवाना रद्द

- तपासणीत शरीरास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस