भाईंंदर : उत्तन येथे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलाचा चाकूचा वार लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे सुरू आहे.
उत्तन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूनम बिंदेशकुमार सोनी या आपल्या पती बिंदेशकुमार काशीप्रसाद सोनी, मुलगा अभय , मुलगी स्नेहा आणि मुलगा रोहन यांच्यासह उत्तन येथे धावगी डोंगर येथे वास्तव्यास आहेत. बिंदेशकुमार आणि त्यांचा मोठा मुलगा अभय हे उत्तन नाका परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान चालवतात, तर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जुलै रोजी रात्री कुटुंब जेवण करून घरी बसले असताना पती-पत्नीमध्ये नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला न गेल्याच्या कारणावरून वाद झाला. बिंदेशकुमार यांनी स्वयंपाकघरातील भाजी व फळे कापण्याचा चाकू हातात घेत पत्नीवर धाव घेतल्याचा आरोप आहे.
यावेळी आईला वाचवण्यासाठी मोठा मुलगा अभयमध्ये पडला व पित्याच्या हातातील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना चाकू अभयच्या डाव्या बाजूच्या बरगडीत घुसला. गंभीर जखमी झालेल्या अभयला प्रथम उपचारासाठी उत्तन येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अभयला तपासून २७ जुलै रोजी पहाटे १ वाजता मृत घोषित केले. या प्रकरणी पुनम सोनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती बिंदेशकुमार काशीप्रसाद सोनी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी सदरील बिंदेशकुमार यांना ताब्यात घेतले आहे.
पुढील अधिक तपास उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड हे करत आहेत.