मुंबई : मोसमी पावसाने हवामान विभागासह सर्वांना चांगलेच चकवले असून यंदा कमी पाऊस होणार असल्याचे अंदाज आजघडीला तरी खोटे ठरवले आहेत. मुंबईत जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाने जुलैच्या अखेरीला तडाखा दिला असून अनेक भागात पुराची स्थिती आहे. केरळमध्ये पावसाने ८ बळी घेतले आहेत. ईशान्येला आसाममध्येही पुराने थैमान घातले असून आतापर्यंत ८२ जणांचे बळी गेले आहेत.
केरलममध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून, पूर येऊन आणि राज्यभरात मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ५,७९२ लोकांना २०९ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
गुजरातमध्ये रस्ते जलमय झाल्यामुळे तीन राष्ट्रीय महामार्ग आणि ३० राज्य महामार्गासह ६०७रस्ते गुजरातमधील विविध भागांत बंद ठेवावे लागले आहेत. राज्यात आजवर ६८.५८ टक्के पाऊस झाला आहे. गुजरातमधील २०६ धरणांपैकी २४ धरणे पूर्ण भरली आहेत, २७ धरणे ७० ते १०० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाची पाण्याची पातळी गेल्या २४ तासांत ७५ सेमीने वाढली आहे.
राजस्थानच्या २४ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. बिहारमध्ये बिहारच्या बांका येथे वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या विविध जिल्ह्यात पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आसाममध्ये पावसाचा जोर आता थोडा कमी असला तरी पूरस्थिती भीषण आहे. सात जिल्ह्यांमधील सुमारे दोन लाख लोकांना पुराचा फटका बसला पावसाने चकवले आहे. सुमारे १५ हजार हेक्टर जमिनीवरची पिके वाहून गेली असून हजारो जनावरे मरण पावली आहेत.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे रविवारी सकाळपासून होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यातील पाणी वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईसाठी अंदाज
या आठवड्यातही मुंबई व परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० सेल्सियस आणि २७ सेल्यियसच्या आसपास राहील.
मुंबईकरांना दिलासा
ऑगस्टची सुरुवातच मुसळधार पावसाने झाल्याने मुंबई व महानगर क्षेत्रात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा जूनपासून आतापर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत एकूण १९१६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तो वार्षिक सरासरी पावसाच्या ८३.६३% आहे, तर कुलाबा वेधशाळेत १६२६.६ मिमी पावसाची नोंद झाली असून तो वार्षिक सरासरी पावसाच्या ७७.६४% आहे. 'एल निनो 'च्या हवामान परिस्थितीमुळे हवामान विभागाने या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी जुलैच्या सुरुवातीला मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे वार्षिक सरासरी पावसाची भरपाई झाली आहे.