भाईंंदर : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यासंदर्भात दिलेली मुदत संपल्यानंतर मीरा रोड परिसरात काही रिक्षाचालकांनी आंदोलन सुरू केले. मीरा रोड येथील पिनाकोला म्हाडा वसाहत परिसरात काही रिक्षाचालकांनी आंदोलन करत रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याची दखल घेत मीरा-भाईंदर प्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे २५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली असून चालकांना सुमारे सात हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तसेच कारणे दाखवा नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली.
आंदोलनाच्या नावाखाली रिक्षा रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे तसेच प्रवाशांना रिक्षातून खाली उतरवून अरेरावी करून नाहक त्रास देणे, हे प्रकार नियमबाह्य असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने रिक्षा उभ्या केल्याप्रकरणी नो-पार्किंगची कारवाई करण्यात आली.
प्रवाशांवर अरेरावी केल्यास कारवाई
प्रवाशांशी उद्धट वर्तन करून त्यांना रिक्षातून खाली उतरण्यास भाग पाडल्याचे आढळल्यास संबंधित चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा चालकांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा आरटीओ अधिकारी प्रसाद नलावडे यांनी दिला.
आमच्यावरच कारवाई का?
काही अमराठी रिक्षाचालकांनी आपली आर्थिक परिस्थिती मांडत मराठी भाषा शिकण्यासाठी अधिक मुदत देण्याची मागणी केली आहे. आम्ही दिवसाला शंभर-दोनशे रुपये कमावणारी माणसे आहोत; आमच्यावरच कारवाई का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही चालकांनी मात्र मराठी भाषा शिकण्यास नकारात्मक भूमिका घेतल्याचेही समोर आले आहे.