उरण : मोरा ते भाऊचा धक्का (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दरात मंगळवार, २६ मे पासून २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामाचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने या पावसाळी हंगामासाठी नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, प्रौढांच्या पूर्ण तिकिटाचे दर ८० रुपयांवरून थेट १०५ रुपये करण्यात आले आहेत, म्हणजेच यात २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर लहान मुलांच्या (हाफ तिकीट) दरात ३९ रुपयांवरून ५३ रुपयांपर्यंत म्हणजेच १४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ २६ मे पासून ते ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षकांनी दिली आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामाचे कारण पुढे करून या मार्गावर २० ते २५ रुपयांची दरवाढ केली जाते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर उन्हाळी हंगामातही ही वाढलेली किंमत कमी केली जात नाही, ती तशीच कायम ठेवली जाते.