मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २२ एप्रिल रोजी झालेली दोन लोकल समोरासमोर आल्या होत्या. त्यामुळे अपघाताची शक्यता होती. पण, ही संभाव्य दुर्घटना टाळण्यात रेल्वेच्या इंटरलॉकिंग प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली, असा खुलासा मध्य रेल्वेने केला आहे.
मध्य रेल्वेने सांगितले की, या घटनेत मोटरमनने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी, रेल्वेची पायाभूत संरचना ही मानवी हस्तक्षेप आणि स्वयंचलित ‘फेल-सेफ’ यंत्रणा यांच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आली आहे.
या घटनेच्या प्राथमिक तपासानुसार, मानवी चुकीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेच्या ‘इंटरलॉकिंग सिस्टिम’ आणि ‘ऑक्सिलरी वॉर्निंग सिस्टिम’ (एडब्ल्यूपीएस) या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांनी या काळात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंटरलॉकिंग ही रेल्वे कार्यान्वित करण्याची एक मूलभूत सुरक्षा यंत्रणा आहे. ही यंत्रणा गाड्यांच्या परस्परविरोधी हालचालींना प्रतिबंध करते आणि स्थानके, जंक्शन्स तसेच क्रॉसिंगवरून गाड्यांचे सुरक्षित मार्गक्रमण सुनिश्चित करते.
पुढील मार्ग पूर्णपणे सुरक्षित असेल तरच ही यंत्रणा गाड्यांना ‘हिरवा सिग्नल’ देते. तसेच सर्व पॉइंट्स योग्य रीतीने जुळलेले आणि लॉक असल्याची खात्री केल्याशिवाय सिग्नल क्लिअर होत नाही, ज्यामुळे टक्कर किंवा रुळावरून घसरण्यासारख्या दुर्घटना टळतात.
२२ एप्रिल रोजी इंटरलॉकिंग प्रणालीच्या अचूक कार्यामुळे मोटरमनने लाल सिग्नलपूर्वीच गाडी थांबवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सतर्क कर्मचारी आणि सुरक्षित तंत्रज्ञान यांच्यातील समन्वय ही मध्य रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.