मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. ३ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा ८.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत धरण क्षेत्रातही पावसाची जोरदार हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ३ जुलै रोजी १ लाख २९ हजार ३०८ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीकपातीत आणखी वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून धरण क्षेत्रात पावसाची संथगतीने रिपरिप सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ होत आहे.
दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी तो अद्याप समाधानकारक पातळीपासून दूर असल्याने मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे.
३ जुलै रोजी पाणीसाठा (टक्केवारीत)
अप्पर वैतरणा - ०
मोडकसागर - २२.६४
तानसा - ४.९९
मध्य वैतरणा - १२.८६
भातसा - ६.६५
विहार - ६१.७६
तुळशी - ३९.४३
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)
अप्पर वैतरणा - ३८.०० मिमी
मोडकसागर - ३७.०० मिमी
तानसा - ५५ मिमी
मध्य वैतरणा - ३६ मिमी
भातसा - ७३.०० मिमी
विहार - १३७.०० मिमी
तुळशी - १६४ मिमी