मुंबई : उत्तर भारतीय हिंदी भाषिक रिक्षा, टॅक्सीचालकांनी मराठी भाषा शिकून मराठी भाषेतूनच संवाद साधावा अन्यथा परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मात्र मुंबईत रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी जागेची कमतरता, वेळेचे बंधन, प्रशिक्षणाची अडचण येत असल्याने पालिकेच्या शाळांमधील रिकामे वर्ग उपलब्ध करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना व उत्तर भारतीय एकता मंच यांच्या वतीने मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिक्षक संघटनेचा निर्णय अतिशय योग्य असून त्याला माझ्यासह महापौर रितू तावडे यांनी देखील अनुकूलता दर्शवली असल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले तसेच आमच्या मागणीबाबत महापौर-उपमहापौर यांनी सकारात्मकता दर्शवली असून पालिकेचे वर्ग उपलब्ध करण्याबाबत सहाय्यक करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना व उत्तर भारतीय एकता मंचतर्फे कार्याध्यक्ष दिलीप डुंबरे आणि सरचिटणीस शिवाजी शेंडगे यांच्याकडून देण्यात आली.