मुंबई : मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.
सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते.
धरणातील पाणीसाठा आणि भातसा, अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो, इतका उपलब्ध आहे. मात्र, यंदा पाऊस कमी पडणार असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
ठाणे, भिवंडीतही पाणीकपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्याठिकाणीही शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.