मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) जलवाहिनीला आज (दि.21) पहाटे पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागली. परिणामी, तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. यामुळे अनेक परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरूस्तीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
माहितीनुसार, तानसा जलवाहिनीला पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. गळती लागल्याचे लक्षात येताच झडपा (व्हॉल्व्ह) बंद करण्यात आला. गळती रोखून दुरुस्तीचे काम जलअभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तरी या दुरुस्तीकरीता 24 तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
'या' भागात पाणीपुरवठा होणार बाधित
दुरुस्तीच्या कामासाठी जलवाहिनीतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील परिसारत पाणीपुरवठा होणार नाही.
एस विभाग - गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर
के पूर्व विभाग - ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर
जी उत्तर - धारावी
एच पूर्व - बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस
या भागातील नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.