मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व मॅनहोलची तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून दोन दिवसांत तब्बल १६,६२३ मॅनहोल्सची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे.
मुंबईत एकूण १ लाख ३ हजार ९९६ मॅनहोल्स असून, त्यापैकी ९६,३८३ मॅनहोल्सवर सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मॅनहोल्सवर जाळ्या बसविण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक मॅनहोल उघडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. या मोहिमेसाठी महापालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांतील अनेक पथके कार्यरत आहेत.
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान सुमारे १,८०० मॅनहोल्स झाकून टाकण्यात आले असल्याचेही निदर्शनास आले आहे. हे मॅनहोल पुन्हा शोधून उघडून कार्यान्वित करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, मुंबईतील मॅनहोलच्या संख्येबाबत आणि सुरक्षा जाळ्या बसविण्याच्या कामाबाबत महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १,०३,९९६ मॅनहोल असून त्यापैकी ९६,३८३ मॅनहोलवर सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. म्हणजेच ४,४६४ मॅनहोलवर अद्याप जाळ्या बसवायच्या आहेत.
मात्र, यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शहरात ७३,४३७ मॅनहोल असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यापैकी ७१,२३६ मॅनहोलवर सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले असून केवळ २,०११ मॅनहोलवर जाळ्या बसविणे बाकी असल्याचे न्यायालयाला कळविण्यात आले होते.