मुंबई

मुंबईकरांसाठी चांगली बातमी! यंदा पाणीकपात नाही; जलाशयांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

Swapnil S

मुंबई : मुंबईत गेले तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. याच कालावधीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मुंबईतील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळू शकते, असे पाणी खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबई महापालिका हद्दीत अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी मोडक सागर, विहार, तुळशी आणि तानसा हे तलाव जुलैच्या अखेरीपासून भरून वाहू लागले होते. मध्य वैतरणा २५ ऑगस्टपासून वाहू लागला होता.

अप्पर वैतरणा धरणात शुक्रवारी ६०३.४८ मीटर (एमएसएल) इतकी पाणीपातळी (पूर्ण पुरवठा पातळी- ६०३.५१ मीटर) आहे. या धरणात गेल्या वर्षी या तारखेला इतकाच म्हणजे २,२६,०८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. पण, या धरण क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजे २७३८ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे (गतवर्षी- २४६२ मिमी). मोडक सागर धरणाची आजची पाणीपातळी १६३.१६ मीटर (टीएचडी) आहे. या धरणाची पूर्ण पुरवठा पातळी १६३.१५ मीटर आहे. या धरण क्षेत्रात आजच्या तारखेपर्यंत गतवर्षी ३२२७ मिमी पाऊस झाला होता, तर यंदा ३३९८ मिमी पाऊस झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा १,२८,९२५ दशलक्ष लीटर म्हणजे गेल्या वर्षी इतकाच आहे.

मध्य वैतरणा जलाशयाच्या क्षेत्रात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ९८३ मिमी जास्त म्हणजे ३३९८ मिमी इतका पाऊस यंदा पडला आहे (गेल्या वर्षी- २४१५ मिमी ). तर उपयुक्त पाणीसाठा सध्या १,९१,५८२ दशलक्ष लिटर आहे. गतवर्षी तो १,९०,०१२ दशलक्ष लिटर होता.

विहारमध्ये सध्या २७,६९८ दशलक्ष लिटर म्हणजेच गेल्या वर्षी इतकाच पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे तुळशी तलावातही आज ८०४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा असून गतवर्षीही इतकाच साठा होता.

पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागल्याने पालिकेने मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर जूनमध्ये अपेक्षित पाऊस न पडल्याने १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र जुलैमध्ये समाधानकारक पाऊस होऊन चार तलाव भरल्याने ही कपात रद्द करण्यात आली होती.

उपयुक्त पाणीसाठा तुलनेत कमी

तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा २८९६ मिमी पाऊस झाला आहे (गतवर्षी- २८२६ मिमी). उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी -१,४४२४० दशलक्ष लिटर (गतवर्षी- १,४४,५९३ दशलक्ष लीटर) आहे. तलावाची आजची पातळी १२८.२८ (टीएचडी) आहे. तलाव वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर (टीएचडी) आहे.

भातसाची स्थिती

मुंबईला होत असलेल्या पाणीपुरवठ्यापैकी सु्मारे ५० टक्के पाणीपुरवठा हा भातसा धरणातून होतो. या धरणाच्या क्षेत्रात यंदा आतापर्यंत ३२०१ मिमी (गतवर्षी- ३०२६ मिमी ) पाऊस झाला आहे. सध्याचा उपयुक्त पाणीसाठा ७,११,८२४ दशलक्ष लिटर आहे. तो गेल्या वर्षी ७,१७,०३७ दशलक्ष लिटर होता. धरणाची आजची पाणीपातळी १४१.८८ मीटर आहे (गतवर्षी-१४२.०७ ). धरणाची पूर्ण पुरवठा पातळी १४२.०७ (एमएसएल) आहे. सध्या ती १४१.८८ मीटर (गतवर्षी- १४२.०७) आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भातसा तसेच अप्पर वैतरणा तलाव लवकरच भरून वाहू शकतील.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा