मुंबई : उन्हाच्या तडाख्याने लोकांचा जीव कासावीस झाला असताना गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहेत. गिरगाव, दादर, वडाळा या भागात विजेचा खेळखंडोबा सुरू असून तासनतास लाइट येत नसल्याने दादरकर हैराण झाले आहेत.
एकीकडे तीव्र उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असतानाच मुंबई शहरातील पुरवठा यंत्रणा जुनी झाल्याने शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास दादर येथील किंग्स वे रिसिव्हिंग स्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर क्रमांक २ आणि ३ एअर ट्रिप झाल्यामुळे शुक्रवारी रात्री दादर, वडाळा आणि पारशी कॉलनी परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि गिरगाव दादर वडाळा आदी परिसरातील पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागला. मात्र तोपर्यंत या भागातील रहिवासी व व्यावसायिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.
गिरगाव चौपाटी आणि गावदेवी परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी रात्री अचानक खंडित झाला. उच्च दाब केबलच्या ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.
त्यामुळे गिरगाव चौपाटी आणि गावदेवी परिसर काही काळ अंधारात होता. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने घटनास्थळी धाव घेत युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. तब्बल दीड तासानंतर दुरुस्ती करण्यात यश आल्याने वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
बेस्ट प्रशासनाची भूमिका
बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्या म्हणाल्या, "शुक्रवारी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागला. नागरिकांना झालेल्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे. अनेक वीजवाहिन्या जुन्या झाल्या असून, त्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे. मान्सून तोंडावर असल्याने, हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत."
काय घडले नेमके?
बेस्टच्या माहितीनुसार, किंग्सवे सबस्टेशन चार ३३,००० व्होल्टच्या फीडर लाइन्सद्वारे कार्यरत आहे. यापैकी ट्रान्सफॉर्मर क्र. १ शी जोडलेली एक फीडर लाईन आधीच दुरुस्तीसाठी बंद होती. शुक्रवारी संध्याकाळी ट्रान्सफॉर्मर क्र. ३ ला वीजपुरवठा करणारी फीडर लाईन नादुरुस्त झाली. त्यामुळे संपूर्ण भार ट्रान्सफॉर्मर क्र. २ वर आला. मात्र, अवघ्या ३० मिनिटांत हा फीडरही ट्रिप झाल्याने परिस्थिती गंभीर झाली.
बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "ट्रान्सफॉर्मर क्र. २ ची केबल रात्री ८.३० च्या सुमारास ट्रिप झाली, ज्यामुळे तीन ट्रान्सफॉर्मर बंद पडले होते. मध्यरात्री १२ ते पहाटे ३ या वेळेत ८०% वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, तर उर्वरित भागांत पहाटे ५.२० वाजेपर्यंत वीज पूर्ववत झाली." दरम्यान, शनिवारी सकाळी ११.१० वाजता शीतलदेवी साई शरण केबल ट्रिप झाल्याने दादर परिसरात पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाला होता, जो दुपारी १.३० वाजेपर्यंत टप्याटप्याने दुरुस्त करण्यात आला.
यंत्रणा जुन्या झाल्या
या संदर्भात बोलताना वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणाले की, "एअर कंडिशनर्स आणि कूलिंग उपकरणांच्या अतिवापरामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे, ज्याचा ताण वीज वितरण यंत्रणेवर पडत आहे. तसेच, बेस्टच्या अनेक जुन्या केबल्स आणि यंत्रणा बदलणे आता गरजेचे झाले आहे. बेस्टने प्रत्येक भागाची मागणी तपासून त्यानुसार पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशन करावे."
मागणी ४,५०० मेगावॉटच्या पुढे
मुंबईतील विजेची मागणी या आठवड्यात ४,५०० मेगावॉटच्या पुढे गेली असून, मे २०२४ मधील ४,३०० मेगावॉटचा विक्रम मोडीत काढला आहे. केवळ शनिवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत शहराची मागणी ३,८७८ मेगावॉटवर पोहोचली होती. याआधी १४ मे रोजी देखील शीतलादेवी सबस्टेशनमध्ये केबल फॉल्टमुळे दादर, शीतलादेवी आणि माटुंगा रोड परिसरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता.