काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यासह लोकसभा अध्यक्षांवर टीका केली होती. दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी पत्रकारालाच फटकारल्याने याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनी, "थेटपणे तुम्ही भाजपसाठी काम करता का? करत असाल तर तसा भाजपचा टॅग छातीवर लावून फिरा. उगाच पत्रकार असल्याचे भासावी नका." असे म्हणत झापले होते. यावरून आता पत्रकार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई प्रेस क्लबने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, 'राहुल गांधींनी माफी मागावी' अशी मागणी केली आहे. त्यांनी एक पत्रक जारी करत म्हंटले आहे की, "पत्रकाराचे काम हे प्रश्न विचारणे आहे. संबंधित प्रश्नांना सभ्यपणे उत्तरे देणे, हे राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते राहुल गांधी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यात अयशस्वी ठरले, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून राहुल गांधींनी आपली चूक मान्य करत संबंधित पत्रकाराची माफी मागावी," असे निवेदनात मागणी केली आहे.
हेही वाचा :
प्रश्न विचारताच पत्रकारांवर भडकले राहुल गांधी; नेमकं काय घडले?
राहुल गांधींनी एका पत्रकाराने त्यांना, 'न्यायालयाचा जो निर्णय आला, त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला, असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे?' असे विचारले. यावरून राहुल गांधी यांनी भडकून उत्तर दिले की, "आत्ताच पत्रकारांनी ३ वेळा यासंदर्भात प्रश्न विचारले. एवढ्या थेटपणे तुम्ही भाजपसाठी काम करता का? करत असाल तर तसा भाजपचा टॅग छातीवर लावून फिरा. तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसे उत्तर दिले, तसेच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असे दाखवू नका." अशी टीका केली. त्यानंतर पत्रकाराला पुन्हा म्हणाले की, "काय झाले? सगळी हवा निघाली?"