मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली. आता जुलै महिन्याच्या अखेरीस काहीसा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतून जवळपास पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. गेले आठ दिवस पावसाने मुंबईला झोडपून काढले असून अनेक सखल भागांत पाणी साचल्यानंतर आता मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, जागोजागी अस्वच्छता आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरित घ्या उपचार
ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब, कावीळ किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास उपचारांसाठी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, पाऊस ओसरल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची पैदास झपाट्याने वाढते. त्यामुळे घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे, अन्नपदार्थ स्वच्छ व झाकून ठेवावेत आणि वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
प्रतिबंधक फवारणी, जनजागृतीला वेग
मुंबई महापालिकेकडून डास प्रतिबंधक फवारणी, धुरळणी आणि जनजागृती मोहिमेला वेग देण्यात आला असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा धोका कमी झाला असला, तरी आता साथीच्या आजारांपासून बचावासाठी प्रत्येकाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.