Mumbai : विक्रोळीत कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची, मुलाची हत्या; पत्नी, धाकटा मुलगा गंभीर जखमी 
मुंबई

Mumbai : विक्रोळीत कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची, मुलाची हत्या; पत्नी, धाकटा मुलगा गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून गुरुवारी पहाटे विक्रोळी येथील पार्कसाईट, राहुल नगर येथे दुहेरी हत्याकांडाची घटना घडली.

प्रतिनिधी

अवधूत खराडे/मुंबई:

कौटुंबिक वादातून गुरुवारी पहाटे विक्रोळी येथील पार्कसाईट, राहुल नगर येथे दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. येथे दोन भावांनी एका महिला नातेवाईकाच्या मदतीने आपल्या ४० वर्षीय मोठ्या भावाची आणि त्याच्या १४ वर्षांच्या मुलाची भोसकून हत्या केली. या हल्ल्यात मृत व्यक्तीची पत्नी आणि धाकटा मुलगा गंभीर जखमी झाले आहे.

सुनील कालीचरण विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा श्लोक विश्वकर्मा (वय १४) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि त्यांचा धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसह शिवछाया सोसायटीत राहत होते, तर त्यांचे दोन लहान भाऊ सुरेंद्र उर्फ सोनू कालीचरण विश्वकर्मा आणि सूरज कालीचरण विश्वकर्मा हे याच घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. क्षुल्लक कारणांवरून वर्षभरापेक्षा अधिक काळापासून या कुटुंबात वारंवार वाद होत होते आणि त्यांच्यातील तणाव सतत वाढत होता, असे पोलिसांनी सांगितले.

सुनील रात्री १२.१५ च्या सुमारास कामावरून घरी परतले तेव्हा अंजू आघोळीला गेल्यावर सुरेंद्र मोबाईलवर सतत मोठ्या आवाजात अश्लील गाणी लावत असल्याबद्दल सुनील यांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर हा प्राणघातक वाद सुरू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

सूरजने चाकूने सुनील यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. कुटुंबातील सदस्य मध्यस्थी करण्यासाठी धावले असता, सुरेंद्रने १४ वर्षीय श्लोकच्या खांद्यावर चाकूने वार केले, तर सूरजने अंजू आणि लहान विवान यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

दोन्ही भावांनी चाकूने हल्ला केल्यानंतर सुरेंद्रची पत्नी प्रीती विश्वकर्मा हिने मुख्य दरवाजा बाहेरून बंद करून पीडितांना आतच अडकवले आणि आरोपींना मदत केली. शेजाऱ्यांनी तातडीने फोन केल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चारही पीडितांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार अर्ज १७ ऑगस्टपर्यंत भरा! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी

Thane : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी