मुंबई : वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा प्रस्ताव संख्याबळाअभावी सभागृहात मंजूर करणे भाजपला ३० एप्रिल रोजी अशक्य झाले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या सभागृहात हा प्रस्ताव मतदान घेण्यात आले. यात भाजप-महायुतीला ११२, तर विरोधकांना ७९ मते मिळाली आणि गृहनिर्माण संस्थेचा प्रस्ताव सभागृहात अखेर मंजूर करण्यात आला.
वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव ३० एप्रिलला महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावेळी तातडीचे कामकाज म्हणून महापौर रितू तावडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी तातडीच्या कामकाजासाठी मतदानाची मागणी केली. यावेळी महापौर यांनी सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे की नाही, याची शहानिशा न करता मतदानाला परवानगी दिली. यात सत्ताधाऱ्यांना उपस्थित नगरसेवकांच्या तीनचतुर्थांश मतदान न झाल्यामुळे त्यांच्यावर प्रस्ताव नामंजूर करण्याची नामुष्की ओढवली. याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पालिकेतील वरिष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली तर महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांची मुंबई भाजप अध्यक्ष साटम यांनी बैठक बोलावली. यावेळी भाजपच्या नगरसेवकांना शिस्तीचे धडे द्या, तातडीचा प्रस्ताव तर सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करा, असे निर्देश साटम यांनी दिले. दरम्यान, मतदानावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ११२ मते पडली तर विरोधकांच्या बाजूने ७९ मते पडली.
सत्ताधाऱ्यांचे ९, विरोधकांचे २६ नगरसेवक गैरहजर
पालिकेमध्ये २२७ नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे. परंतु भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांचे निधन झाल्यामुळे सभागृहात २२६ नगरसेवक आहेत. या सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे १२१, तर विरोधकांचे १०५ नगरसेवक आहेत. पण मतदान प्रक्रियेच्या वेळी सत्ताधारी पक्षाचे ९ नगरसेवक व विरोधकांचे २६ नगरसेवक अनुपस्थित होते.