मुंबई : मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून, विकास कामांना वेग देण्यासाठी ६३० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे मुंबईतील विकास कामे वेळीच मार्गी लागतील, असा विश्वास मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
नागरी वस्त्यांमध्ये सुधारणा, शासकीय भूखंडांना कुंपण भिंती बांधणे, वने, मत्स्यव्यवसाय, कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींची बांधकामे, शासकीय महाविद्यालयांचा विकास, शासकीय निवासी इमारती, व्यायामशाळा आणि क्रीडांगणांचा विकास आदी योजनांसाठी एकूण ६३० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याची माहिती लोढा यांनी यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई उपनगर जिल्ह्याचा ‘जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत त्या आखाखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी चालू आर्थिक वर्षात विकासाचे नियोजन केले आहे. त्यात अनुसुचित जाती जमातींच्या तसेच आदिवासींच्या विकासाठी तरतूद केली आहे. विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती लोढा यांनी दिली.