मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश आदी लोकांची नावे घेण्यासाठी माझा तुरुंगात तपास अधिकाऱ्यांकडून छळ केला जात होता, अशी माहिती मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून मुक्तता झालेल्या भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, मोदी, योगी, भागवत या लोकांची नावे घेतली तर आम्ही तुला मारणार नाही. त्यांचा मुख्य उद्देश माझा छळ करणे हाच होता. मला खोटे बोलण्यास सांगितले जात होते. त्यामुळे मी कोणाचेही नाव घेतले नाही.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झालेल्या माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मोठा खुलासा केला आहे.
तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल बोलताना आपला छळ करण्यात आल्याचे ठाकूर म्हणाल्या आहेत.
त्या म्हणाल्या की, एटीएस अधिकाऱ्यांनी मला १३ दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात वेगवेगळ्या लोकांची नावे घेण्यासाठी छळ करण्यात आला. मात्र मी खोटे बोलले नाही. देशाला घाबरण्याची आवश्यकता नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतो आणि मरतो. एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर कामे केली. माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, असे त्या म्हणाल्या.
ठाकूर म्हणाल्या की, हा भगव्याचा विजय आहे, धर्माचा विजय आहे आणि सनातन धर्माचा विजय आहे. या लोकांमध्ये इतकी हिंमत नाही की पराभूत करू शकतील. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा लोकांना शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे संपूर्ण प्रकरण तयार करण्यात आले होते, त्याला पुराव्याचा कोणताच आधार नव्हता, पण सत्य हे उघड होत असते. या प्रकरणात असेच झाले, असे त्या म्हणाल्या.