मुंबई

टॅक्सी संघटनांच्या बेमुदत संपाला रिक्षा चालकांनी दर्शवला पाठिंबा

रिक्षा-टॅक्सी युनियन्सने येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून शहरातील रिक्षा चालकांनी देखील पाठिंबा दर्शवला

देवांग भागवत

मागील ६ महिन्यांपासून शहरातील रिक्षा - टॅक्सीचालक युनियन्स भाडेवाढीबाबत शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी असून तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. परंतु सरकारकडून अद्याप याची दखल न घेता केवळ आश्वासने दिली जात आहेत. यामुळे रिक्षा-टॅक्सी युनियन्सने येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून शहरातील रिक्षा चालकांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

येत्या १५ सप्टेंबरपासून मुंबईतील टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत. वाढत्या सीएनजी दरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी ही प्रमुख मागणी आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून टॅक्सी चालक संपावर जाण्याच्या तयारीत असून टॅक्सीचे किमान प्रवासी भाडे १० रुपयांनी वाढवावे अशी टॅक्सी चालकांची मागणी आहे. मुंबईत सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. त्यात १० रुपयांची वाढ करण्यात यावी, यासाठी टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाली आहे. या संपाला मुंबईतील रिक्षा चालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भाडेवाढीबाबत टॅक्सी चालक संघटनेकडून याआधी शिंदे सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मात्र या मागण्यांवरील निर्णय सरकार दरबारी प्रलंबित आहे. यासंदर्भात टॅक्सी चालक संघटना आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाल्या. परंतु या चर्चांमधून भाडेवाढीबाबत तोडगा न निघाल्यामुळे अखेर टॅक्सी चालक संघटनांनी संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे शहरातील रिक्षाचालकांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे.

१ मार्चपासून म्हणजेच गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला भाडे वाढीबाबत केवळ आश्वासनच देण्यात येत आहे. आम्ही विश्वास ठेवत अनेकदा संप मागे घेतला. मात्र हजारो टॅक्सी चालकांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता सरकारने तात्काळ भाडेवाढीचा निर्णय घ्यावा.

- ए. एल. क्वाड्रोस, नेते, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

पावसाचा आणखी आठवडाभर मुक्काम; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा; बोरिवली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

नागपूर येथील विधान भवन, रवि भवनचे काम रखडले; थकीत रकमेमुळे कंत्राटदारांचा कामावर बहिष्कार

आठ महिन्यांच्या गरोदर तलाठीची शेतकऱ्यांसाठी धाव; शेताच्या बांधावर जाऊन केले पंचनामे

शुद्ध सांडपाण्याचा वापर बंधनकारक होणार; राज्य सरकारचे धोरण जाहीर