पत्राचाळ घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता पार पडण्याची शक्यता आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर त्यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने प्रथम ईडी कोठडीत रवानगी केली. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. सध्या राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अखेर सुमारे १५ दिवसांनंतर राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव घेऊन जामीनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.