मुंबई : दक्षिण मुंबईतील इस्माईल कुर्ते रोडवरील घारी मोहल्ला परिसरात विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री कुटुंबाने खाल्लेल्या 'चिकन पुलाव', कलिंगड आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत.
मृत पावलेल्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री आपल्या घरी नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पाहुणे गेल्यानंतर रात्री सुमारे १ च्या सुमारास कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या सर्वांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक पथकाने मंगळवारी सकाळी डोकाडिया यांच्या घराची झडती घेऊन 'चिकन पुलाव', कलिंगड, पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले. हे नमुने कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत.
पाहुण्यांना कोणताही त्रास न झाल्याचे उघड
जे. जे. मार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी स्नेहभोजनाला उपस्थित असलेल्या पाच पाहुण्यांचे जबाब नोंदवले आहेत. या पाहुण्यांनीही पुलाव खाल्ला होता, मात्र त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. प्रथमदर्शनी हे अन्नातून झालेल्या विषबाधेचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांचा अभिप्राय राखून ठेवला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी चौघांच्या शरीराचे अवयव (व्हिसेरा) रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.