मुंबई

जव्हारमध्ये बुडून दोघांचा, विरारमध्ये एकाचा तर ठाण्यात एकाचा मृत्यू

पावसाळ्यात समुद्रात अथवा धरण किंवा तलावात पोहायला जाण्याचा मोह पडला महागात

नवशक्ती Web Desk

मुंबई/ठाणे/पालघर : पावसाळ्यात समुद्रात अथवा धरण किंवा तलावात पोहायला जाण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र अतिउत्साहाच्या भरात अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. अशाच घटना मुंबईसह, विरार, ठाणे आणि जव्हारमध्ये घडल्या आहेत. मुंबईत मार्वे समुद्रात बुडालेल्या पाचपैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी उर्वरित तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. जव्हारमध्ये दाभोसा आणि काळमांडवी धबधब्याखाली बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये पापडखिंड धरणात तीन जण बुडाले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाला जीव गमवावा लागला. ठाण्यातील उपवन तलावातही सोमवारी दुपारी बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दाभोसा येथे पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी ठाणे येथून आलेला एक १८ वर्षीय युवक काळमांडवी धबधबा येथे वाहून गेला. या दोघांचे मृतदेह शोधण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासन व जव्हार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.

विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात रविवारी संध्याकाळी पोहण्यासाठी गेलेले तीन मुले बुडाली. त्यापैकी स्थानिकांनी अंश (१२) आणि वंश( ११) या दोघा मुलांना वाचवले. मात्र ११ वर्षीय ओम बोराडे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पापडखिंड धरण परिसरात फिरण्यासाठी तसेच पाण्यात पोहण्यासाठी बंदी आहे. गेल्या आठवड्यातही याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

ठाण्यातील उपवन तलावामध्ये सोमवारी दुपारी चार ते पाच मित्र पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य लक्ष्मण पवार (१७ वर्षे) याचा बुडून मृत्यू झाला. तो ठाण्यातील आर. जे. ठाकूर कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता.

पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली

आजचे राशिभविष्य, ५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special Recipe : जेवणाची मजा होईल दुप्पट; बनवा मसालेदार प्रॉन टिक्का मसाला

Kitchen Tips : पावसाळ्यात स्वयंपाकघरातील सामान खराब होण्याची चिंता? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन