मुंबई : वर्सोवा ते भाईंदरदरम्यान या प्रस्तावित रस्त्यासाठी शासकीय व खासगी जमिनींचे तातडीने संपादन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (सीआरझेड वगळता) भागात सुरू करण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्पासाठी विविध परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या पार्श्वभूमीवर बांगर यांनी प्रकल्प स्थळांना भेट देत आढावा घेतला आहे.
मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वर्सोवा ते भाईंदर प्रकल्प अंतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून नुकतीच तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट घेऊन आवश्यक निर्देश दिले.
या प्रकल्पात कांदळवन वळतीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यास तत्त्वतः मंजुरी नुकतीच प्राप्त झाली आहे. सध्या भूगर्भ सर्वेक्षण, पर्यावरणीय व वाहतूक व्यवस्थापन नियोजन, यंत्रसामग्री जमवाजमव, आराखड्यांची अंतिम रूपरेषा तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे बांगर यांनी सांगितले. त्यामुळे वर्साेवा-भाईंदर किनारी रस्ता प्रकल्पाला आता वेग येणार आहे.
असे होईल प्रकल्पाचे काम
तसेच हे काम पॅकेजनुसार होणार आहे. पॅकेज सी व डी अंतर्गत माईंडस्पेस (मालाड) ते चारकोप खाडीपर्यंत बोगदा बांधणीचे काम होणार आहे. तर पॅकेज ई मध्ये चारकोप खाडी ते गोराई आंतरमार्गिका (उन्नत मार्ग) तयार करण्यात येणार आहे. तर पॅकेज एफ अंतर्गत गोराई ते दहिसर आंतरमार्गिका (उन्नत मार्ग) पॅकेज बी अंतर्गत काही (नॉन सीआरझेड) भागात आधीच काम सुरू झाले आहे