मुंबई

मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; पाणी पुरवठा करणारे पाचही तलाव झाले ओव्हरफ्लो

Swapnil S

मुंबई/शहापूर/मोखाडा: आजपासून श्रावण महिना सुरू होत असतानाच मुंबईकरांना ‘गूड न्यूज’ मिळाली आहे. मुंबईकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा पाचवा तलावही भरून वाहू लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई व परिसरातील अनेक धरण भरून वाहू लागले.

वैतरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ रविवारी ४ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी भरून वाहू लागला. यानंतर या धरणाचे दोन दरवाजे उघडले. सध्या या वैतरणा धरणातून ७०६.३० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती मुंबई मनपाच्या जलअभियंता खात्याने दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता १९३,५३० दशलक्ष लिटर आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील या धरणाचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले.

सात धरणांत ८९.१० टक्के जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लिटर आहे. सध्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के जलसाठा आहे.

भातसा धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडले

शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून रविवारी सकाळी पावणेसातच्या दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यावेळी तीन वक्र दरवाजे उघडले.

गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. घोटी, इगतपुरी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने भातसा धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे.

भातसा धरणाची पाणी पातळी १३८.३० असून धरण भरून वाहण्याची पाणी पातळी १४२ मीटर आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग व पाणी पातळीचे नियमन करण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला आहे. नदीपात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पूजनासाठी पाचनंतर तीन वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, असे भातसा नगर, कार्यकारी अभियंता रवी पवार यांनी सांगितले.

मध्य वैतरणा भरून वाहू लागला

गेल्या महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव वाहू लागले होते. त्यापाठोपाठ रविवारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ भरून वाहू लागला. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ५ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा