राष्ट्रीय

"मी वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार" : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहीण वायएस शर्मिला काँग्रेसमध्ये, पक्षही केला विलीन

आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला खूप आनंद झाला असेल की त्यांच्या मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला

Swapnil S

आगामी लोकसभा आणि वाधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला मोर्चा आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण, संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची मुलगी आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या सर्वेसर्वा वायएस शर्मिला यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. आपला पक्षही त्या काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशात काँग्रेसला बळ मिळाले आहे.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार -

वायएसआर यांनी तेलुगू लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन दिले. आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला खूप आनंद झाला असेल की त्यांच्या मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. मी काँग्रेसमध्ये राहून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेन याचा आनंद आहे, असे शर्मिला यांनी म्हटले.

वायएस शर्मिला यांना काँग्रेसकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला यांच्या माध्यमातून आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

२०१२ साली जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत युवाजना श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाची (वायएसआरसीपी) स्थापना केली होती. मात्र, भ्रष्टाचार प्रकरणात जगनमोहन रेड्डींना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली. तुरुंगातून बाहेर आल्यावर जगनमोहन रेड्डी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शर्मिला आणि जगनमोहन यांच्यात मतभेद झाल्यावर शर्मिला यांनी युवाजना श्रमिका रायथू तेलंगणा पक्षाची (वायएसआरटीपी) स्थापना केली.

तेलंगणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. मतविभाजन होऊन भारत राष्ट्र समितीला फायदा होऊ नये म्हणून शर्मिला यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच वायएस शर्मिला यांना पक्षात आल्याने त्यांच्यावर काँग्रेस आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात जगनमोहन विरुद्ध बहीण वायएस शर्मिला सामना रंगणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली