राष्ट्रीय

CA परीक्षांचा निकाल जाहीर: दिल्लीचा शिवम मिश्रा देशात पहिला; मुंबई, नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची बाजी

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रा याने ५०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. तर दिल्लीच्या वर्षा अरोरा हिने ४८० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग आणि नवी मुंबईच्या घिलमान सलीम अन्सारी या दोघांनी तिसरा क्रमांक मिळवत सीए परीक्षेत बाजी मारली आहे.

आयसीएआयने मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेच्या गट-१ ची ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २७.३५ आहे. तर गट-२ ची परीक्षा ५८ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २१ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या गटाचा निकाल ३६.३५ टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे गट-१ आणि गट-२ या दोन्ही गटाची परीक्षा ३५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी केवळ ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १९.८८ टक्के आहे.

सीए इंटरमीडिएट परीक्षेत भिवाडी येथील कुशाग्र रॉय याने ५३८ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले आहे. तर अकोला शहरातील युग सचिन कारिया आणि भाईंदर शहरातील यज्ञ ललित चांडक याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. या दोघांनाही ५२६ गुण मिळाले आहेत. तिसरा क्रमांक दिल्लीचा मनितसिंग भाटिया आणि मुंबईच्या हिरेश काशिरामका यांनी पटकावला असून त्यांना ५१९ गुण मिळाले आहेत. सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या गट-१ साठी १ लाख १७ हजार ७६४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी केवळ ३१ हजार ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ७१ हजार १४५ विद्यार्थ्यांनी गट-२ ची परीक्षा दिली होती, त्यापैकी केवळ १३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटातील ५९ हजार ९५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ११ हजार ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना प्रभावीपणे राबवा - आरोग्य मंत्री

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता