Photo : ANI
राष्ट्रीय

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

जुनाट शस्त्रास्त्रांनी आपण वर्तमानातील युद्ध जिंकू शकत नाही, आयात केलेल्या परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे असून त्याचा आपल्या युद्ध सज्जतेवर परिणाम होतो आणि आपली क्षमता कमकुवत होते. आपल्या सुरक्षेसाठी स्वदेशी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे, असे परखड मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

Swapnil S

नवी दिल्ली : जुनाट शस्त्रास्त्रांनी आपण वर्तमानातील युद्ध जिंकू शकत नाही, आयात केलेल्या परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे असून त्याचा आपल्या युद्ध सज्जतेवर परिणाम होतो आणि आपली क्षमता कमकुवत होते. आपल्या सुरक्षेसाठी स्वदेशी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे, असे परखड मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे आयोजित ‘यूएव्ही आणि सी-यूएएस’ या तंत्रज्ञान प्रदर्शनात भारताच्या संरक्षण धोरणावर त्यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने भारतात सोडलेले काही ड्रोन पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत सापडले. काहींचा तर वापरच झाला नसावा असे वाटते, असे ते म्हणाले.

आमच्या ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मिशन्ससाठी जर आपण आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलो, तर त्याचा फटका युद्ध सज्जतेला बसतो. उत्पादन क्षमताही मर्यादित राहते, सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत आणि युद्धसज्जता कायम ठेवणे कठीण होते. आपण जेव्हा आपल्या प्रणालीची घरीच रचना करतो, तयार करतो आणि नावीन्य आणतो, तेव्हा आपण आपली गुप्तता राखू शकतो, खर्च वाचवतो आणि उत्पादनावर आपला पूर्ण ताबा ठेवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे ड्रोन निष्प्रभ

पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रत्युत्तरात भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, भारतीय वायुदल आणि संरक्षण यंत्रणांनी त्यांना कशा प्रकारे निष्प्रभ केले हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. बहुतेक ड्रोन काइनेटिक आणि नॉन-काइनेटिक पद्धतींनी नष्ट करण्यात आले आणि काही ड्रोनवरुन कळते की ड्रोनमध्ये कार्यक्षमतेचा अभाव होता, असेही त्यांनी सांगितले.

‘आकाशतीर’ चा उल्लेख

चौहान यांनी भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची प्रशंसा करताना ‘आकाशतीर’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीचा उल्लेख केला, जी ‘आयजीएमपीडी’अंतर्गत विकसित झाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ‘आकाश एनजी’ या नव्या व्हेरियंटने ड्रोन स्वार्म्स आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा अचूक प्रतिकार केला. ही प्रणाली एमएसीएच २.५ च्या वेगाने आणि ३० मीटर ते २० किमीपर्यंतच्या उंचीवरील लक्ष्य भेदू शकते.

काळाची गरज

युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानानेच लढले जाईल, भूतकाळातील शस्त्रास्त्रे आता उपयुक्त ठरत नाहीत. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे हे स्पष्ट झाले आहे की स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली ‘सी-यूएएस’ प्रणाली आवश्यक आहे. चौहान यांनी सांगितले की, या ऑपरेशनदरम्यान पाकने शस्त्र नसलेल्या ड्रोनचा वापर केला होता, परंतु भारताने त्यातील बहुतेक ड्रोन पाडले. ते ड्रोन आमच्या लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतीही हानी पोहोचवू शकले नाहीत.

रणनीतीचे नवे रूप

ड्रोन हे युद्धातील रणनीतीचे नवे रूप आहे, ज्यामुळे मोठ्या सैनिकी साधनांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे लष्करांनी आता आपली हवाई रणनीती आणि संरक्षण तंत्रज्ञान पुन्हा नव्याने आखणे गरजेचे आहे. ड्रोनचा वापर लष्कराने त्यांचा वापर अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी पद्धतीने केला आहे. विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहून आपले उत्पादन आणि दुरुस्ती क्षमता कमी होते. त्यामुळे स्वदेशी यंत्रणांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असेही चौहान म्हणाले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’