भारताचे १४वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये निरोप देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात येत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला व दोन्ही सभागृहांचे खासदार उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी आपल्या निरोपाच्या भाषणात म्हणाले, “आज माझे मन भरून आले आहे. मी, माझ्या क्षमतेनुसार माझे कर्तव्य पार पाडले याचा मला आनंद आहे. देशसेवेची संधी दिल्याबद्दल मी देशवासीयांचा कायम ऋणी राहील. आज देश प्रगतिपथावर असून, विरोधी पक्षांनीही जातीपातीच्या व घराणेशाहीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज आहे.
तुम्ही सरकारच्या धोरणांवर असहमत असाल तर संविधानाने तुम्हाला विरोध प्रकट करण्याचा अधिकार दिला आहे. महात्मा गांधींनी यासाठी देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार व शिकवण आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजे,” असे राष्ट्रपती म्हणाले. दौपदी मुर्मू २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील.