नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या प्रादेशिक पक्षांचा पराभव झाला आहे. या बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचा मुकाबला करण्यासाठी नवीन रणनीती आखणे आणि आपसातील मतभेद मिटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील तब्बल २३ राजकीय पक्ष सोमवारी एकत्र येत आहेत.
येथील ‘कॉन्स्टिट्युशन क्लब’ येथे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह डाव्या पक्षांचे आणि इतर छोट्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'एक्स' वर पोस्ट करत माहिती दिली की, २३ राजकीय पक्षांनी या ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत सहभागी होण्याला दुजोरा दिला आहे. विविधतेमध्येही विरोधी पक्षांची ही आघाडी अजूनही एकसंध आहे, असे त्यांनी सांगितले.
रमेश यांनी पुढे सांगितले की, काही पक्षांनी त्यांच्या स्वतःच्या कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली असली, तरी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांना आणि कृतींना आपला तीव्र विरोध असल्याचे कळवले आहे.
या बैठकीला द्रमुक आणि आम आदमी पार्टी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे, तर ‘टीव्हीके’ या पक्षाचा आघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे.