नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शस्त्रसंधीबाबत एकमत झाले असले तरी सोमवारी दोन्ही देशांमध्ये त्रयस्थ ठिकाणी महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि दहशतवादी ताब्यात देण्याबाबत पाकिस्तान तयार असेल तरच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, अन्यथा दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या विनंतीनंतर आम्ही युद्धविरामासाठी तयार झालो. याचदरम्यान पाकिस्तानकडून जर गोळीबार झाला, तर त्याचे उत्तर बॉम्बगोळ्याने देऊ, असा सज्जड इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या संवादादरम्यान दिला आहे.
“जर पाकिस्तानने काही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल. जर सीमेपलीकडून गोळी झाडली गेली तर भारतही इथून बॉम्बगोळे झाडेल. युद्धबंदीच्या घोषणेनंतर पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. भारतानेही त्यांच्या तळांवर हल्ला करून याला जोरदार प्रत्युत्तर दिले. काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करणे. याशिवाय बोलण्यासारखे काही नाही. जर ते दहशतवाद्यांना सोपवण्याबद्दल बोलत असतील तर आपण बोलू. माझा इतर कोणत्याही विषयावर बोलण्याचा हेतू नाही. आम्हाला कोणाचीही मध्यस्थी नको आहे,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए, सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत रविवारी सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीत पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत चर्चा झाली. भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भारताने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले की, “जर पाकिस्तानने काही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल.”
दरम्यान, व्हान्स यांच्याशी चर्चा झाली, त्याच रात्री पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ला केला आणि भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ला करून भारताने त्यांना जशास तसे उत्तर दिले.
आज भारत-पाक ‘डीजीएमओ’ चर्चा
भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या युद्धविरामानंतर दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओ’मध्ये सोमवारी दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे.
केवळ दोन देशांमध्ये चर्चा
काश्मीरबाबत आम्ही चर्चा करायला तयार नाही. काश्मीरमध्ये केवळ आता पाकव्याप्त काश्मीर राहिला आहे. सैन्याची कारवाई रोखण्यासाठी ‘डीजीएमओ’ स्तरावरील संवाद हे माध्यम आहे. या चर्चेत तिसऱ्या देशाला किंवा तिसऱ्या पक्षकाराला सामील करणे गैर आहे. भारत हा पाकिस्तानच्या ‘डीजीएमओ’शिवाय अन्य कोणाशाही बोलण्यास तयार नाही, असे सूत्रांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.
गोळीचे उत्तर बॉम्बगोळ्याने देऊ!
पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी गोळीबार केला, तर आपणही गोळीनेच उत्तर द्यायचे. त्यांनी हल्ला केला, तर आपणही हल्ल्यानेच उत्तर द्यायचे. वहाँ से गोली चलेगी, यहाँ से गोला चलेगा. त्यांच्या हवाई तळांवरील हल्ले, हा या ऑपरेशनमधील निर्णायक क्षण होता.”