राष्ट्रीय

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

इंडिगोच्या विमानसेवांतील गोंधळावर केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. FDTL नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी DGCA ने इंडिगोच्या CEO ला नोटीस बजावली असून, प्रवाशांना पूर्ण रिफंड व सामान ४८ तासांत परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली आहेत. शुक्रवारी (दि.५) तब्बल १,००० उड्डाणे रद्द केल्याने हजारो प्रवासी विमानतळावर अडकले होते. ही परिस्थिती तांत्रिक अडचणी, खराब हवामान, क्रू-रोस्टरमध्ये बदल आणि ऑपरेशनल कोलमडल्यामुळे निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले याचे व्हिडिओ आणि विमानतळावरचे फोटो चर्चेत आले होते. अशातच, केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोच्या कारवाईवर भाष्य केले.

इंडिगो विमानसेवा विस्कळीत होण्याबाबत नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “दिल्ली उच्च न्यायालयाने फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स (FDTL) नियमांवर सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय दिले होते. त्यानंतर, आमच्या मंत्रालयाने आणि डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने देशातील सर्व एअरलाइन्सना हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते. या नियमांची अंमलबजावणी दोन टप्प्यांत १ जुलै २०२५ आणि १ नोव्हेंबर २०२५ पासून करण्यात आली."

इंडिगोने गांभीर्याने घेतले नाही

पुढे ते म्हणाले, "सर्व विमान कंपन्यांनी यावर काम केले, पण इंडिगो (IndiGo) ने याला अपेक्षितरित्या गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे DGCA च्या माध्यमातून आम्ही तात्काळ कारवाई केली. ४ सदस्यांची तपास समिती नेमण्यात आली. २४ तास कार्यरत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आणि फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स (FDTL) नियम फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित ठेवण्यात आले.

प्रवाशांचे सामान ४८ तासांच्या आत परत करण्याचे निर्देश

"DGCA ने इंडिगोच्या CEO ला कारण दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, इंडिगोला प्रवाशांचे पैसे कोणत्याही कॅन्सलेशन चार्जशिवाय परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांचे सामान ४८ तासांच्या आत परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपास समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चितच पुढील कारवाई केली जाईल.” असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ

मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली आहे. ज्या मार्गावर सामान्यतः तिकीट ५,००० ते ७,००० च्या दरम्यान उपलब्ध होते, तिथे आता तात्काळ प्रवासासाठी १५,००० ते २०,००० इतका दर आकारला जात आहे. मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट ३०-३५ हजारांना मिळू लागले आहे. परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी ५९-६० हजार रुपये मोजावे लागत आहेत.

रिफंड मिळणार

इंडिगोने म्हटले आहे की, विमानसेवा रद्द झाल्याने प्रचंड त्रास झालेल्या प्रवाशांना त्यांनी मूळ पेमेंट केलेल्या पद्धतीनुसार आपोआप रिफंड दिला जाईल. तसेच ५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ज्या प्रवाशांनी तिकिट रद्द केले आहे किंवा आणि प्रवासाची वेळ बदलली आहे अशा प्रवाशांना त्यासाठीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

RRB Recruitment 2026 : रेल्वेत ३,९९३ पदांसाठी मेगाभरती; अर्ज प्रक्रिया सुरू, पात्रता काय? जाणून घ्या

वाराणसी विमानतळावर धक्कादायक प्रकार! मुंबईकडे निघालेल्या प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक सुटली गोळी; दोन कर्मचारी जखमी

Mumbai : नेव्ही नगरमध्ये नौदल जवानासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू; घरात आढळले चौघांचे मृतदेह

शाहरुख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला FDA चा दणका; 'विमल इलायची' जाहिरातीप्रकरणी नोटीस

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण