पाच वर्षांनंतर भारत-चीनने कैलास-मानसरोवर यात्रा यंदाच्या जूनपासून सुरू करण्याचे ठरवले आहे. लडाख सीमेवरून दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव कमी झाल्याचे यातून दिसून येत आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याने शनिवारी ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू केली जाईल असे जाहीर केले.
उत्तराखंडमधील लिपूलेख पास व सिक्कीममधील नाथुला पास या दोन मार्गांनी यात्रा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी अखेरची यात्रा ही २०१९ मध्ये झाली होती. पण २०२० मध्ये कोरोना महामारी आणि चीनसोबत सीमेवरील तणावामुळे ती स्थगित करण्यात आली होती. कैलास पर्वत व मानसरोवर हे चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रांतात आहे. हे स्थळ हिंदू, जैन व बुद्ध धर्मासाठी पवित्र आहे.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन, इथे करा नोंदणी-
भाविकांच्या एकूण पाच तुकड्या लिपुलेखमार्गे पाठवल्या जातील. प्रत्येक तुकडीत ५० भाविक असतील. तर, नाथुलामार्गे येथून दहा तुकड्या पाठवल्या जातील, प्रत्येक तुकडीत ५०-५० भाविक असतील. या यात्रेसाठी kmy.gov.in या बेवसाइटवर अर्ज करावा. या यात्रेसाठी भाविकांची निवड संगणकाच्या सहाय्याने निःपक्षपातीपणे केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्जदारांना पत्र पाठवण्याची गरज नाही. तसेच त्यांच्याकडून अन्य माहिती मागवली जाणार नाही.