बंगळुरू : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सॉफ्टवेअर विकासाची व्याकरणच बदलत आहे आणि भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कोड लिहिणे हे मुख्य काम राहणार नाही, असे ज्येष्ठ तंत्रज्ञ नंदन निलेकणी यांनी मंगळवारी सांगितले.
एआयचा स्वीकार इंटरनेट आणि स्मार्टफोनसारख्या आधीच्या कोणत्याही तांत्रिक संक्रमणापेक्षा वेगाने होत असून, व्यवसाय कसा चालतो यामध्ये मूलभूत बदल घडवण्याच्या दिशेने तो वाटचाल करत आहे, असे निलेकणी म्हणाले.
‘प्रतिभावंतांना अशा जगाशी जुळवून घ्यावे लागेल जिथे कोड लिहिणे हे अंतिम उद्दिष्ट नसेल. त्याऐवजी एआय कार्यरत करणे व तत्सम गोष्टी महत्त्वाच्या ठरतील,’ असे त्यांनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदार कार्यक्रमात सांगितले. “ग्राहक प्रवास, ऑपरेटिंग मॉडेल्स आणि मानसिक चौकटी-सगळेच बदलावे लागेल. प्रत्येक उद्योगसंस्थेला स्वतःची कार्यपद्धती नव्याने विचारात घ्यावी लागेल.”
कोडिंगचे महत्त्व कमी झाले तरी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. प्रतिभा-परिवर्तन मोठ्या प्रमाणावर होईल आणि एआय इंजिनिअर्स, फॉरवर्ड डिप्लॉयमेंट इंजिनिअर्स, फॉरेन्सिक विश्लेषक अशा काही वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेल्या भूमिका उदयास येतील, असे निलेकणी म्हणाले.
एआयच्या अभूतपूर्व स्वीकाराचा वेग अधोरेखित करताना निलेकणी म्हणाले की, इंटरनेटला एक अब्ज वापरकर्त्यांपर्यंत पोहोचायला दहा वर्षांहून अधिक काळ लागला. स्मार्टफोनला पाच वर्षे, तर एआयचा स्वीकार अवघ्या काही वर्षांत होत आहे.यामागे आधीच्या तांत्रिक पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे.
लेगसी सिस्टीम्सचे आधुनिकीकरण आता पुढे ढकलता येणार नाही, यावर त्यांनी भर दिला. उच्च देखभाल खर्च, तुटक डेटा आणि वाढते सायबर धोके यांचा हवाला देत ते म्हणाले, ‘दशकानुदशक साचलेले तांत्रिक कर्ज आता फेडावेच लागेल. ते पुढे ढकलण्याचा पर्याय उरलेला नाही.’ एआयमुळे आधुनिकीकरण जलद आणि तुलनेने कमी खर्चात शक्य होते, मात्र अंमलबजावणी अजूनही गुंतागुंतीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लेगसी सिस्टीम्सबाबत बोलताना त्यांनी सांगितले की अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या आयटी बजेटपैकी ६० ते ८० टक्के रक्कम देखभालीवर खर्च करतात. ज्याचा व्यवसायमूल्य शून्य असतो. हा प्रकार उलटवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
उद्योगांनी पहिल्या तत्त्वांवर आधारित विचार, तटस्थ प्रणाली डिझाइन आणि संस्थांमधील सहकार्य स्वीकारावे, असे आवाहन करत निलेकणी म्हणाले, “संधी आजवरपेक्षा मोठी आहे; धोका संधीमध्ये नाही, तर अंमलबजावणीत आहे.”
सर्व व्यवसायांची पद्धत बदलेल
प्रत्येक तांत्रिक संक्रमणाचे परिणाम झाले आहेत, पण यावेळी व्यवसाय चालवण्याची पद्धतच मुळापासून बदलते आहे. ग्राहक प्रवास, ऑपरेटिंग मॉडेल्स, प्रतिभा-सगळ्याच बाबी बदलाव्या लागतील,’ असे निलकेणी म्हणाले.