नवी दिल्ली : भारतात रोज २.३ कोटी लोक रेल्वे प्रवास करतात. या प्रवाशांना तिकीट काढण्यात येणाऱ्या अडचणी व वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वेने १ जुलैपासून विविध सेवांच्या नियमात मोठे बदल केले आहेत. रेल्वे तिकीट दरवाढ, आरक्षण, प्रतीक्षा यादी, तत्काळ नियम आदींच्या नियमांत बदल होणार आहेत. हे नियम माहिती नसल्यास प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
रेल्वे तिकीट दरवाढ, तत्काळ तिकीट, प्रतीक्षा यादी, आरक्षण यादी बनवण्याचा कालावधी आदींमध्ये बदल करण्यात आले असून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शी व कठोर बनवण्यात आली आहे.
तत्काळ बुकिंग आता आधार संलग्न
तत्काळ बुकिंगसाठी ‘आयआरसीटीसी’ खाते हे आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे. तसेच तत्काळ बुकिंग करण्यापूर्वी १० मिनिटे केवळ आधार संलग्न वापरकर्त्यांना तिकीट बुकिंगसाठी मिळेल. त्यावेळी रेल्वे तिकीट एजंट तिकीट काढू शकणार नाहीत.
रेल्वेने तिकिटांची सुरक्षा व बनावट बुकिंग रोखण्यासाठी १५ जुलैपासून तिकीट बुकिंगसाठी आधारशी संबंधित मोबाइल क्रमांकावर ‘ओटीपी’ सक्तीचा केला आहे. हा ‘ओटीपी’ टाकल्याशिवाय तिकीट बुक होणार नाही. तसेच काऊंटरवर काढल्या जाणाऱ्या तत्काळ तिकिटालाही आधार प्रमाणीकरण करावे लागेल.
आता रेल्वे गाडी निघण्यापूर्वी ८ तास आधी आरक्षण यादी बनवण्यात येणार आहे. यापूर्वी ही यादी ४ तास आधी बनत होती.
रेल्वे मंत्रालयाने सर्व वातानुकूलित वर्गासाठी प्रतीक्षा यादीची मर्यादा ६०% आणि विनावातानुकूलित श्रेणींसाठी ३०% पर्यंत मर्यादित करणारा सुधारित आदेश जाहीर केला आहे.
रेल्वेची तिकीट दरवाढ
१ जुलैपासून रेल्वेने तिकीट दरात किंचित वाढ केली आहे. विनावातानुकूलित (नॉन एसी) वर्गाचे भाडे प्रति किमी १ पैसा व वातानुकूलित (एसी) वर्गासाठी प्रति किमी भाडे २ पैसे प्रति किमी वाढवले आहे, जर तुम्ही ५०० किमी प्रवास करत असल्यास वातानुकूलितसाठी १० रुपये, तर विनावातानुकूलितसाठी ५ रुपये दरवाढ होणार आहे. जर तुम्ही १ हजार किमी प्रवास करत असल्यास ही दरवाढ १० ते २० रुपये होऊ शकते. या दरवाढीमुळे रेल्वेला दरमहा ९०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.