नवी दिल्ली : मी पळपुटा नाही, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना सांगून देश सोडला, मला चोर म्हणणे चुकीचे आहे. कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४ हजार कोटी वसूल केले आहेत, असा दावा परागंदा उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे. बँकांसोबत तडजोड करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने सांगितले. यूट्यूबर राज शमानी याच्यासोबत पॉडकास्टमधून ही माहिती समोर आली आहे.
विजय मल्ल्या ६,२०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. नऊ वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या मल्ल्यांनी यूट्यूबर राज शमानी याच्याशी चार तासांच्या पॉडकास्टमध्ये आपले जीवन, व्यवसाय, किंगफिशर एअरलाइन्सचे अपयश, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आणि कायदेशीर लढाई यावर मोकळेपणाने चर्चा केली.
सध्या मल्ल्या लंडनमध्ये असून त्यांचे उत्पन्न विदेशी दारू कंपन्यांमधून येते. ते म्हणतात, मी कायदेशीर लढा देत आहे, जर मला न्याय्य सुनावणी मिळाली तर भारतात परतण्याचा विचार करेन. तुरुंगात जाणे माझ्या नशिबात असेल, तर त्याचाही सामना करेन.
किंगफिशर एअरलाइन्सच्या आर्थिक अडचणी जागतिक अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर वाढत गेल्या. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आपण भेट घेतली. मी प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, किंगफिशर एअरलाइन्सचे ऑपरेशन्स कमी करावे लागतील, काही विमाने बंद करावी लागतील आणि कर्मचाऱ्यांना कमी करावे लागेल. कारण मला एवढे खर्च परवडणार नाहीत. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला. मला सांगण्यात आले की, ऑपरेशन कमी करू नका. तुम्ही काम सुरूच ठेवा, बँका तुम्हाला सहकार्य करतील.
बँकांनी दीडपट वसुली केली
मल्ल्यांनी १७ बँकांकडून एकूण ६,२०३ कोटींचे कर्ज घेतले. मात्र त्यांचा दावा आहे की बँकांनी त्यांच्या संपत्तीतून १४ हजार १३१.६ कोटी रुपये वसूल केले. म्हणजे मूळ कर्जाच्या दीडपटपेक्षा जास्त. मी २०१२ ते २०१५ या काळात चार वेळा सेटलमेंट ऑफर दिल्या, त्यात ५००० कोटींचा प्रस्तावही होता. पण बँकांनी नाकारले. सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाकडे मी वसुलीचा हिशेब मागत आहे.
आयडीबीआय बँकेचे कर्ज फेडल्याचा दावा
सीबीआयने त्यांच्यावर ‘ब्रँड व्हॅल्युएशन’ आणि खासगी जेटच्या गैरवापराचे केलेले आरोप मल्ल्या यांनी नाकारले. ईडीने त्यांच्यावर ३,५४७ कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंगचे आरोप लावले, पण ते म्हणतात, एअरलाइन्सच्या ५० टक्के खर्चासाठी विदेशी चलन वापरणे मनी लॉड्रिंग नाही. त्यांनी आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज फेडल्याचेही सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या थकीत पगार न दिल्याचे दु:ख
मल्ल्यांनी कबूल केले की, किंगफिशर एअरलाइन्सच्या काही कर्मचाऱ्यांना पगार देता न आल्याचे त्यांना दुःख वाटते. ते म्हणाले, माझ्याकडे कोणतेही कारण नाही. मला वाईट वाटते. त्यांनी २६० कोटी रुपये रिलीज करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण बँकांनी आक्षेप घेतला. संपत्ती फ्रीझ झाल्यामुळे निधी उभारता आला नाही.
भगोडा अर्थशास्त्र, काँग्रेसची टीका
तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना सांगून देश सोडला, असे मल्ल्या यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. नरेंद्र यांची संपूर्ण यंत्रणा ‘सरेंडर’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारचे पकोडा अर्थशास्त्र आता ‘भगोडा अर्थशास्त्र’ झाले आहे, असेही विरोधी पक्षाने म्हटले आहे. मल्ल्या यांनी जेटली यांचा संदर्भ देऊन जी माहिती दिली त्यावरून मल्ल्या देशातून पसार होण्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होते, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
मला चोर म्हणू नका...
मल्ल्या २ मार्च २०१६ रोजी बैठकीसाठी लंडनला गेले. ते म्हणाले, मी अरुण जेटलींना सांगितले होते की मी जात आहे आणि सेटलमेंटची चर्चा करणार आहे. पण पासपोर्ट रद्द झाल्यामुळे अडकलो. मी भगोडा नाही. ही काही पळून जाण्याची योजना नव्हती. मला चोर म्हणणे चुकीचे आहे. माझी ओळख एक कष्टाळू उद्योगपती म्हणून व्हावी, जो १.७५ लाख कोटी रुपयांची बाजारपेठ निर्माण करू शकतो - चोर म्हणून नव्हे. किंगफिशर अपयशी ठरली, पण मी माझ्या परीने संपूर्ण प्रयत्न केला. भारतात व्यवसाय फसला की तो फसवणूक ठरवला जातो.