नवी मुंबई : नवी मुंबईत अथवा नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने जलसंकट उभे राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने खबरदारी म्हणून आठवड्यातून एक दिवसाऐवजी आठवड्यातून तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागील आठवड्यातच घेतला आहे.
सद्य स्थितीत मोरबे धरणात फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची जलचिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्य:स्थितीत मोरबे धरणात फक्त २५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच म्हणजेच २५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सरासरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोरबे धरण परिसरात पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मोरबे धरणातील जलसाठा
महिना २०२३-२४ २०२४-२५
जून १८.२० मि.मी. ८०.६० मिमी.
पाणी पातळी ६९.०९ मी. ६९.०५ मी.
पाणीसाठा ४८.४६३ दलघमी ४८.२५९ दलघमी
पाणीसाठा २९.५० टक्के २५.२८ टक्के
मोरबे धरण क्षेत्रात अद्याप पाणीसाठा वाढू शकेल, असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरात पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. मोरबे धरणातील पाणीसाठ्याबाबत पालिका प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. - अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नमुंमपा