नवी मुंबई : पावसाळ्यात धबधबे, डोंगर आणि तलाव परिसरात होणारे अपघात तसेच पर्यटकांच्या बुडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. खारघर व तळोजा परिसरातील अनेक धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी संबंधित परिसरात ठिकठिकाणी इशारा देणारे सूचना फलकही लावले आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच खारघरमधील डोंगररांगा, धबधबे आणि निसर्गरम्य स्थळांवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील हजारो पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे खारघर व तळोजा परिसरातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालून ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
पर्यटकांनी केवळ निसर्गाचा आनंद घेण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात न घालता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि सुरक्षित पावसाळी पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही खारघर पोलिसांनी केले आहे.
घोषित करण्यात आलेली प्रमुख प्रतिबंधित ठिकाणे
पांडवकडा धबधबा परिसर
चाफेवाडी परिसर
फणसवाडी परिसर
सेक्टर-५ येथील ड्रायव्हिंग रेंज परिसर
ओवे कॅम्प धरण परिसर
तळोजा कारागृहासमोरील डोंगर परिसर
तळोजासमोरील तलाव परिसर
खारघरमधील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, सेक्टर-५ येथील ड्रायव्हिंग रेंज, ओवे कॅम्प धरण, तळोजा कारागृहासमोरील डोंगर तसेच तळोजासमोरील तलाव परिसरात यापूर्वी अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत या धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.संजय जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर