संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

हार्बरवरील एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा; सामान्य लोकल १५ मिनिटे उशिराने, स्थानकांमध्ये गर्दी वाढली, प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकलचे सुधारित वेळापत्रक लागू केल्यामुळे सीएसएमटी ते पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Krantee V. Kale

टीपीजी कृष्णन/मुंबई

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकलचे सुधारित वेळापत्रक लागू केल्यामुळे सीएसएमटी ते पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसी लोकलमुळे सामान्य लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून त्यामुळे सीएसएमटी स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, एसी लोकलचे वेळापत्रक सुधारा, त्या वेळेवर सोडा, एसीमुळे सामान्य लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे, ते नीट करून प्रवाशांना दिलासा द्यावा, असे निवेदन प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल दरम्यान १ मे २०२६ पासून काही एसी लोकल सेवा सुरू केल्या असून त्यासाठी आधीच्या सामान्य लोकल फेऱ्या कमी केल्या आहेत. उन्हाळ्यापासून दिलासा देण्यासाठी एसी लोकल सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, प्रवाशांच्या मते एसी लोकलचे तिकीट सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर आहेच पण त्याचबरोबर सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सामान्य लोकलची संख्याही एसी लोकलमुळे कमी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटी ते पनवेल धीम्या लोकलच्या आधी कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. संध्याकाळी ६.२६ वाजता पनवेलसाठी सुटणाऱ्या धीम्या लोकलमध्ये महिलांसाठी तीन डबे राखीव आहेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करताना इतर प्रवाशांना विशेष करून पुरुष प्रवाशांसाठी जागा कमी राहते. त्यानंतर ६.३३ वाजता एसी लोकल येत असल्यामुळे ६ वाजून २६ मिनिटांची गाडी मिळाली नाही तर घरी जाणारे प्रवासी स्थानकावर विनाकारण अडकून पडतात, त्यांचा खोळंबा होतो. यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होते आणि प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

एसी, सामान्य लोकलचे वेळापत्रक पाळा!

उशिराने धावणाऱ्या एसी आणि सामान्य लोकलबाबत हार्बर मार्गावरील प्रवाशांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाने एसी आणि सामान्य लोकलचे नियोजन अधिक कार्यक्षमतेने आणि काटेकोरपणे पाळावे, प्रवाशांची व्यवस्था आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी पनवेलकडे जाणाऱ्या प्रवासी गटाने केली आहे.

NCERT पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; हायकोर्टात याचिका

गैरवर्तनानंतर १० वर्षांनी कारवाई करणे अयोग्य; ONGC च्या भूमिकेवर HC चे ताशेरे, माजी अधिकाऱ्याला मोठा दिलासा

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी

Mumbai : 'पुन्हा अशी चूक होणार नाही, याची दक्षता घ्या...'; सभागृहातील गैरहजर नगरसेवकांची भाजपकडून कानउघाडणी

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री भोवली; परिवहन विभागाने दिला दणका