नवी मुंबई : नाताळ सणाच्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) आज (दि.२५) पहिले व्यावसायिक देशांतर्गत विमान आकाशात झेपावले. यासोबतच नवी मुंबईकरांचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात साकार झाले.
गुरुवारी सकाळी ८ वाजता इंडिगोचे पहिले विमान बंगळुरूहून नवी मुंबई विमानतळावर उतरले, तर ८ वाजून ४० मिनिटांनी पहिले उड्डाण हैदराबादसाठी रवाना झाले. प्रारंभी नवी मुंबईहून बंगळुरू, हैदराबाद, गोवा, कोची आणि अहमदाबाद या शहरांसाठी उड्डाणे सुरू होतील. अकासा एअर, इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्टार एअर या विमान कंपन्या सेवा देणार आहेत.
कधी सुरू होणार आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक?
पहिल्याच दिवशी सुमारे ३० विमानांची ये-जा होणार असून, जवळपास ४ हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील. अवघ्या २० दिवसांत, म्हणजे १५ जानेवारीनंतर दररोज ४८ विमानांची ये-जा अपेक्षित आहे. वार्षिक ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळावर पहिल्याच वर्षी २ कोटी प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कार्गो वाहतूकही पहिल्याच दिवसापासून सुरू होणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. मार्च अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच कार्गो वाहतूक सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. बेलापूर येथील सिडको भवनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिडकोच्या परिवहन विभागाच्या महाव्यवस्थापक गीता पिल्लई उपस्थित होत्या.
विमानतळापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी रस्ते, मेट्रो, जलवाहतूक आणि प्रस्तावित हायस्पीड रेल्वे यांसह बहुविध दळणवळण सुविधा विकसित केल्या जात असल्याकडे सिंघल यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे तरघर जेटी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा तसेच भविष्यातील मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वेचे स्थानकही या विमानतळाशी जोडले जाणार आहे.
विमानतळानंतर तिसऱ्या धावपट्टीसाठी अभ्यास करण्यासाठी जागतिक अनुभव असलेल्या संस्थेची नियुक्ती प्रक्रिया सुरू असून, प्रवाशांसाठी दळणवळण अधिक सुसह्य करण्यासाठी सिडकोकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बहुतांश प्रकल्प जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसराचा विकास नवा वेग घेईल.विजय सिंघल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक