नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब

नवी मुंबई शहरात ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घणसोली, ऐरोली, कोपरखैरणे तसेच गावठाण भागात ८ ते १० तासांपर्यंत वीज गायब राहत असल्याचे चित्र असून, महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाचा पारा चढलेला असताना वीज खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने तुटवडा निर्माण झाला असला तरी नवी मुंबईत उपलब्ध वीजपुरवठा ग्राहकांपर्यंत नियमित पोहोचत नसल्याचा आरोप केला जात आहे.

ऐरोली परिसरात शनिवारी व रविवारी सलग अनेक तास वीज खंडित होती. काही ठिकाणी १० ते १२ तास वीज नव्हती. ऐरोली सेक्टर ८ मध्ये सर्वाधिक काळ पुरवठा बंद राहिला. कोपरखैरणे भागातही सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वारंवार वीज खंडित होत होती. वीज नसल्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी पंपिंग करता आले नाही. परिणामी काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. महावितरणकडून विनापरवानगी रस्ते खोदकाम करण्यात येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. लहान कामांसाठी अनेक दिवस लागल्याने वाहतूक आणि नागरी सुविधा विस्कळीत होत असल्याची तक्रार आहे. वाशी, सानपाडा, पामबीच रोड, वाशी सेक्टर १७ व ३० या भागांना याचा मोठा फटका बसत आहे.

व्यापार-उद्योगांना फटका

वारंवार वीज खंडित झाल्यामुळे व्यापार, उद्योग आणि व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः थंड पेय, आईस्क्रीम विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोपरखैरणेतील रहिवासी संदीप राजपूत यांनी, कितीही वादळ-पाऊस असला तरी काही भागात वीज जात नाही, मात्र इतर भागात सतत खंडित होते. सर्वत्र समान सेवा द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, उपमहापौर दशरथ भगत यांनी, नवी मुंबईत वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे, असे सांगितले.

मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. नियोजित कामांमुळे वीज खंडित होणार असल्यास पूर्वसूचना दिली जाईल. अन्य कारणांमुळे खंडित झाल्यास तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
दीपक पाटील, मुख्य अभियंता महावितरण

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना; अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस