नवी मुंबई : नवी मुंबईतून रिक्षा चोरून ती जालना जिल्ह्यामध्ये विक्री करणाऱ्या २ सराईत चोरट्यांना सीबीडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या चोरट्यांनी नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील १२ रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी या सर्व १२ रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
गत २८ मे रोजी सीबीडी सेक्टर -११ भागातून एक रिक्षा चोरीला गेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीडी पोलिसांनी रिक्षाचोरांचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून २ संशयित आरोपींची माहिती मिळवली. पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपी नाजिमोद्दीन अजीमुद्दीन काझी (४३) याला जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
इंजिन नंबर मिटवल्यानंतरही ओळख पटवली
या गुन्ह्यातील ऑटोरिक्षाचे आरटीओ नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर, चेसी नंबर मिटवले असताना त्यांची ओळख पटविणे अत्यंत जिकीरीचे होते. मात्र त्यानंतर देखील सीबीडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सदर ऑटोरिक्षांची ओळख पटवून एकूण १२ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी दिली. सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील-३, खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी ४, तर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील १, असे १२ रिक्षाचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.