नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) भव्य उद्घाटन पार पडले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्यपाल आचार्य देवव्रत, उद्योगपती गौतम अदानी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्याचे नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
एनएमआयएची केली पाहणी केली, दिव्यांग मुलांशी संवाद
मोदी यांचे आगमन नव्याने बांधलेल्या या अत्याधुनिक विमानतळावर झाल्यानंतर त्यांनी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी टर्मिनल इमारतीचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांची पाहणी केली. या भेटीदरम्यान मोदींनी विशेष मुलांशी संवाद साधला. भारतीय ध्वज फडकावत आणि फुलांचा गुच्छ देत या मुलांनी पंतप्रधानांचे मनापासून स्वागत केले. या प्रसंगामुळे उद्घाटन सोहळ्याचा वातावरण अधिक भावनिक आणि संस्मरणीय बनला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ ठरणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि स्मार्ट प्रवासी सेवांच्या दृष्टीने हे जागतिक दर्जाचे केंद्र मानले जात आहे.
१) भारताचे पहिले पूर्ण डिजिटल विमानतळ:
एनएमआयए हे भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ असून, ते ‘डिजीयात्रा’ सुविधेसह संपूर्णपणे सक्षम आहे. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वयंचलित टर्मिनल प्रणालींद्वारे प्रवाशांना अखंड, कागदविरहित अनुभव मिळेल.
२) प्रारंभिक आणि पूर्ण क्षमता:
पहिल्या टप्प्यात या विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्षी २० दशलक्ष (दोन कोटी) प्रवाशांची आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर चार टर्मिनल्स आणि दोन धावपट्ट्यांसह हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष (नऊ कोटी) प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल.
३) कमळापासून प्रेरित वास्तुकला:
प्रसिद्ध ‘झाहा हदीद आर्किटेक्ट्स’ यांनी डिझाइन केलेल्या या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित आहे. तिचे स्तंभ उलगडणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसतात, जे आधुनिकतेचे प्रतीक आहे.
४) मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी:
एनएमआयए हे भारतातील पहिले प्रमुख हवाई वाहतूक केंद्र असेल जे एक्सप्रेसवे, मेट्रो लाईन्स, उपनगरीय रेल्वे आणि विशेषतः वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतूक प्रणालींनी जोडलेले असेल.
५) सस्टेनेबल ग्रीन विमानतळ:
शाश्वतता लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या विमानतळात ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता आहे. तसेच ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ (SAF) साठवण सुविधा आणि ईव्ही बससेवांचा समावेश आहे.
६) प्रवाशांचा वेळ वाचवणार:
प्रवाशांच्या प्रतीक्षा वेळेत कपात करण्यासाठी टर्मिनलमध्ये ६६ चेक-इन काउंटर आणि २२ सेल्फ-बॅगेज ड्रॉप पॉइंट्स आहेत. भविष्यात चारही टर्मिनल्सना जोडणारी ‘ऑटोमेटेड पीपल मूव्हर’ (APM) सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.
७) आर्थिक विकासाचे इंजिन:
या प्रकल्पामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असून, नवीन औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासाला गती मिळेल.
८) प्रगत लँडिंग प्रणाली:
‘कॅटेगरी २ इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) ने धावपट्टी सुसज्ज असून, ३०० मीटरपर्यंत कमी दृश्यमानतेतही सुरक्षित लँडिंग शक्य होईल. हे सर्व हवामानात कार्यरत राहणाऱ्या विमानतळासाठी मोठे पाऊल आहे.
९) कार्गो आणि एमआरओ हब:
प्रवासी वाहतुकीबरोबरच एनएमआयए भारतातील सर्वात मोठे ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल’ (MRO) केंद्र ठरणार आहे. हे विमानतळ दरवर्षी ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळेल.
१०) लवकरच व्यावसायिक उड्डाणे:
आज उद्घाटन होणार असले तरी व्यावसायिक उड्डाणे डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होतील. उद्घाटनानंतर ४५ ते ६० दिवसांनी पहिले उड्डाण घेण्याची शक्यता आहे. ‘इंडिगो’, ‘एअर इंडिया’ आणि ‘अकासा एअर’ सारख्या प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विविध सुरक्षा, इमिग्रेशन आणि कस्टम एजन्सी एकत्रित केल्यानंतर डिसेंबरच्या सुमारास एनएमआयए एकाचवेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर, हे विमानतळ लंडन हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीने सर्वात मोठ्या प्रवासी क्षमतेपैकी एक ठरेल.