संग्रहित छायाचित्र 
संपादकीय

तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

- भावेश ब्राह्मणकर

इस्रायल-हमास, इस्रायल-लेबनॉन, इस्रायल-इराण किंवा रशिया-युक्रेन या संघर्षामध्ये दररोज शेकडो निष्पाप मृत्युमुखी पडत आहेत. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वृद्ध असे कुणीही अपवाद नाही. हत्या, अपंगत्व, उपासमार हा असा हिंसाचार घडत असताना जगभरातील १९० हून अधिक देश शांत आहेत आणि ७९५ कोटी लोकसंख्या हे सारे निमूटपणे पाहत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

तब्बल अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन तर गेल्या वर्षभरापासून मध्य पूर्वेत इस्रायलचा विविध देशांशी हिंसक संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत जवळपास एक लाख सैनिक आणि २० हजारांहून अधिक नागरिक ठार झाले आहेत, तर इस्रायलचा विविध देशांशी असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक सैनिक व नागरिकांचा बळी गेला आहे. (हानीची ही आकडेवारी प्रत्यक्षात अधिकच आहे). म्हणजेच जगातील या दोन द्वंद्वांमध्ये सव्वा लाखाहून अधिक प्राण गेले आहेत. एवढे होऊनही युद्धे संपण्याची चिन्हे नाहीत. उलट ती भडकतच आहेत. आणखी किती जणांचा जीव घेतला जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही.

आजवरच्या इतिहासात मानवी संहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धच नाही तर देशोदेशी झालेले हिंसक संघर्ष, नागरी उठाव, लष्करी कारवाया, क्रांती आदींमध्ये हजारो प्राण गेले आहेत. पहिले महायुद्ध (१५ ते ३० दशलक्ष), दुसरे महायुद्ध (५० ते ८५ दशलक्ष), रशिया नागरी उठाव (७ ते १२ दशलक्ष), चीनमधील मांचू संघर्ष (२५ दशलक्ष), मंगोलियातील उठाव (२० ते ५७ दशलक्ष), तैपिंग क्रांती (२० ते ३० दशलक्ष), चिनी क्रांती (८ ते ९ दशलक्ष), दुसरे कांगो युद्ध (३ ते ६ दशलक्ष)... ही अशी न संपणारी यादी आहे. आजवर कोट्यवधींचे प्राण गेले. सध्या दिवसाला शेकडो जणांचा बिनदिक्कतपणे जीव घेतला जातोय. हे कसले द्योतक आहे? ही कुठली प्रगती आहे? हा कोणता विकास आहे?

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. जगात शांतता नांदावी, देशोदेशीचे तंटे सामंजस्याने मिटविले जावेत, सलोखा नांदावा हा हेतू त्यामागे होता. तो कितपत यशस्वी झाला? खरेच संयुक्त राष्ट्र पारदर्शकपणे कार्य करते आहे का? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अतिशय निराशाजनक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना करण्यात ज्या बड्या राष्ट्रांनी हिरिरीने सहभाग घेतला होता त्यांचाच दबावही या संघटनेवर कायम राहिला आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघाला लागणाऱ्या निधीच्या पुरवठ्यात त्यांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे त्यांचा वरचष्मा आहे. म्हणूनच ही संस्था तटस्थपणे कार्य करताना दिसत नाही. रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेत बिनबोभाटपणे मानवसंहार सुरू असताना संयुक्त राष्ट्र संघटना कुठे आहे? तिने आजवर शांततेसाठी काय आणि किती प्रयत्न केले? हे प्रयत्न अयशस्वी झाले का? संघर्ष का थांबू शकला नाही? सामंजस्य किंवा शांततेसाठी काय पावले उचलली गेली? या प्रश्नांची उत्तरे म्हटलीत तर ‘हो’ आहेत आणि ‘नाही’ सुद्धा.

अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये एखादी घटना घडली तर तातडीने त्या देशाला जाब विचारण्यासाठी संयुक्त राष्ट्रासह अन्य आंतरराष्ट्रीय संघटना सक्रिय होतात. त्यांना सळो की पळो करून सोडतात. महासत्ता असलेले देश विविध निर्बंध आणून त्या देशाला जेरीस आणतात. मेटाकुटीला आलेला तो देश अखेर शरणागती पत्करतो आणि त्यातच संयुक्त राष्ट्र आणि बडे देश धन्यता मानतात. हेच योग्य आहे का? आणि जे निर्बंधांना भीक न घालता बिनदिक्कतपणे काहीही करतात त्यांना रोखण्याचे काय? एकविसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती केल्याचा बोभाटा होतो आहे. पण, याच काळात माणुसकीचे काय? दिवसाढवळ्या, रात्रीबेरात्री, हॉस्पिटल्स किंवा शाळा, रहिवासी ठिकाणे यांच्यावर तोफगोळे, बॉम्ब, ग्रेनेड, क्षेपणास्त्र बिनदिक्कतपणे टाकले जात आहेत. जीव मुठीत धरणारे अनेकांच्या डोळ्यांदेखत निर्घृणपणे आणि तडफडून जीव सोडत आहेत. हे सारेच काळीज हेलावून सोडणारे आहे. असे असले तरी त्याचा पाझर कुणालाही का फुटत नाही?

समोरासमोर युद्ध करण्याचे दिवस आता नाहीत. अप्रत्यक्ष, ऑनलाईन पद्धतीने, थेट अवकाशातून हल्ले करीत निष्पापांचा बळी घेणारे आजचे आधुनिक संघर्ष हे प्रगतीचे लक्षण मानायचे की अधोगतीचे? पेजर, वॉकीटॉकीसारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रे हातात घेतली आणि त्याचे एखादे बटण दाबले तर त्याचा अचानक होणारा स्फोट, त्यातून होणारी जीवितहानी, जखमींचे आक्रोश, बचावलेल्यांच्या डोळे आणि मनातील भीती हे सारेच धस्स करणारे आहे. काही आठवड्यांपूर्वी लेबनॉनमध्ये झालेले हे हल्ले सर्व जगातच चिंता निर्माण करणारे ठरले. अनेकांनी मोबाईल, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, हेडफोन्स, कॅमेरासारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर करण्यापूर्वी चारदा विचार केला. आपले डिव्हाईस स्फोटकांनी भरलेले आहेत का? अशी सतत शंका येत राहिली. मध्य पूर्वेत तर हजारो नागरिकांनी काही दिवस इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस न वापरण्याचा किंवा त्याला हात न लावण्याचा निर्णय घेतला. यातूनच या हल्ल्याची भीषणता स्पष्ट होते.

मध्य पूर्वेतील संघर्ष दिवसागणिक अधिकच चिघळतो आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष पसरून आता तो लेबनॉन, इराण यांच्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. तो आणखी तीव्र होत अन्य शेजारी देशांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यातून इस्रायल-अरब संघर्ष आकाराला येण्याची चिंता आहे. केवळ मध्य-पूर्वेपर्यंत हे युद्ध मर्यादित राहिलेले नाही. जागतिकीकरण, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे या युद्धाची झळ देशोदेशी पोहोचली आहे. भारतासारखा विकसनशील देश असो की श्रीलंकेसारखा अविकसित देश किंवा मालदीवसारखा अत्यंत छोटा देश. साऱ्यांनाच कमी-अधिक प्रमाणात या संघर्षाची झळ सहन करावी लागत आहे. हा संघर्ष जितका सुरू राहिल तेवढ्या अडीअडचणी वाढणारच आहेत.

महासत्ता असलेल्या अमेरिकेची भूमिका या युद्धात महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दर्शविला असला तरी प्रत्यक्ष तेवढी सक्रियता ठेवलेली नाही. कारण, समोर रशियासारखा महाकाय देश आहे आणि तोच पूर्वापार अमेरिकेचा शत्रूही आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांनंतर शीतसंघर्षात सुद्धा हेच दोन देश एकमेकांविरुद्ध उभे होते. नाटोसारख्या लष्करी संघटनेचा पाठिंबा युक्रेनला आहे. मात्र, नाटो देशांनी अद्याप सबुरी ठेवली आहे. नाटो देश रशिया विरोधात उतरले, तर रशियाकडून थेट अण्वस्त्रांचा वापर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या संघर्षाचे अद्याप महायुद्धात रूपांतर झालेले नाही.

मध्य-पूर्वेत अमेरिकेचा इस्रायलला भक्कम पाठिंबा आहे. वेळेप्रसंगी युद्धनौका, हवाई दल, क्षेपणास्त्रे आदींचा वापर करण्याची सज्जता अमेरिकेने केली आहे. याची जाणीव इस्रायलच्या विरोधातील देशांना आहे. त्यामुळे सध्या हा संघर्ष इस्रायल-हमास, इस्रायल-लेबनॉन, इस्रायल-इराण असा आहे. अमेरिकेने पूर्वीपासूनच इराणला विरोध केला आहे. आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने अमेरिका या संघर्षात उतरण्याची दाट चिन्हे आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने अरब देशही इस्रायलवर तुटून पडतील का, ही सुद्धा भीती व्यक्त होत आहे. तसे झाले तर हे तिसरे आणि या पृथ्वीवरचे अंतिम युद्ध ठरण्याची दाट शक्यता आहे.

विस्तारवाद, अहंकार, स्पर्धा आणि हव्यास यामुळे अनेक देशांची भूमिका, आक्रमकता, धोरणे प्रभावित झाली आहेत. संवाद, चर्चा आणि सामंजस्याला काहीच थारा नाही. जगात सुरू असलेल्या युद्धांमध्ये एवढा मोठा नरसंहार होत असताना मानवाधिकार संघटना काय करते आहे? महिला व बालकांसाठी कार्य करणाऱ्या संघटना कुठल्या बिळात लपल्या आहेत? आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करते आहे? जी२०, जी७ यासह ढीगभर संघटना का शांत आहेत? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. स्वार्थाच्या लवलेशाने माणुसकी सुद्धा लोप पावली आहे. या युद्धात दररोज शेकडो जखमी होत आहेत, अपंग बनत आहेत, काही गंभीर आजारांनी ग्रस्त होत आहेत, काहींना मानसिक विकारांनी घेरले आहे, हजारो नागरिक विस्थापित होत आहेत. हे सारे भयावह असले तरी काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडते आहे. जगभर हे सर्व निमूटपणे पाहिले जात आहे. यातच सारे काही आले. भलेही मानव चंद्र किंवा अंतराळात जाण्याच्या ‘विकास गमजा’ मारत असेल, पण माणसाला सुरक्षित जगण्याची मुभा न देण्याची वृत्ती याच मानवाला खुजे ठरवत आहे. हेच वैश्विक सत्य आहे.

bhavbrahma@gmail.com ( लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत.)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त