भारताने वेस्ट इंडिजविरुध्दच्या चौथ्या टी-२० सामन्यात शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे विंडीजला १९२ धावांचे लक्ष्य मिळाले. ऋषभ पंतने ३१ चेंडूंत सहा चौकारांसह ४४ धावा करून डावाला आकार दिला. दरम्यान, पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. पावसामुळे मैदान ओले झाल्याने नाणेफेकीसही विलंब झाला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला अकील हुसेनने बाद केले. रोहितने १६ चेंडूत आक्रमक ३३ धावा करताना तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. सहाव्या षटकात दुसरा सलामीवीर सूर्यकुमार यादव देखील १४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. दीपक हुडाने २१ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक सहा धावांवर बाद झाला. अक्षरने नाबाद २० धावा केल्या.
पावसामुळे फ्लोरिडाचे मैदान ओले झाल्यामुळे नाणेफेकीस विलंब झाला. भारताने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले. हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या जागी रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांचा समावेश करण्यात आला. भारताने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यातील दोन सामने जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्याने शनिवारचा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची नामी संधी होती.